आ. डॉ आशिष देशमुख यांनी केला गटविकास अधिकारी अंशूजा गराटे यांचा सत्कार

यशवंत पंचायत राज पुरस्कार सन 2023-24

कळमेश्वर पंचायत समितीला राज्यस्तरावर  व  नागपूर विभागातून प्रथम पुरस्कार

“कळमेश्वर पंचायत समिती ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात एक आदर्श”

का टा वृत्तसेवा 
कळमेश्वर : राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून राबविण्यात येणारा यशवंत पंचायत राज पुरस्कार सन 2023-24 करिता ‘कळमेश्वर पंचायत समिती’ ची राज्यस्तरावर निवड झाली आहे. शासनाच्या विवीध स्तरावरील परिक्षणाअंती पंचायत समितीने यशवंत पंचायतराज अभियान 2023-24 अंतर्गत राज्यस्तरावर आणि नागपूर विभागातून प्रथम पुरस्कार पटकावला आहे. अनुक्रमे 21 लाख आणि 11 लाख (संयुक्त) असे पुरस्काराचे स्वरूप असून उत्कृष्ट प्रशासकीय नेतृत्व, नियोजनबद्ध दृष्टिकोन आणि अथक परिश्रमाने कळमेश्वर पंचायत समितीने ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.

                        ‘यशवंत पंचायत राज’ अभियान सन 2023-24 हे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणारे आणि शाश्वत विकासाला चालना देणारे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या अभियानांतर्गत कळमेश्वर पंचायत समितीने प्रशासकीय कार्यक्षमता, विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभाग आणि आर्थिक व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राबवलेल्या पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक समावेशक उपक्रमांनी कळमेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवीन दिशा दिली आहे. प्ंचायत राज ही एक लोकाभिमुख, लोकशाहीची मूळ व्यवस्था आहे, पंचायत राज व्यवस्था ही भारतातील ग्रामीण भागातील लोकशाही व्यवस्थेची एक महत्त्वाची रचना आहे. जी ग्रामीण भागात लोकांना त्यांच्या जीवनात थेट सहभाग घ्यायला सक्षम करते. ही व्यवस्था विकासाच्या मूळ पाया प्रमाणे काम करते व ग्रामीण भागातील लोकांना स्थानिक स्वराज्य आणि प्रशासनात थेट सहभाग घेण्याची संधी देते.

पुरस्काराचा उद्देश : 

                        महाराष्ट्रातील पंचायतींना प्रशासकीय पारदर्शकता, लोकसहभाग, विकासकामांमध्ये पुढाकार आणि चांगल्या प्रशासनासाठी प्रोत्साहित करणे. इतर  पंचायतींसाठी आदर्श निर्माण करणे. पंचायत राज संस्थांना सक्षम बनवणे. या पुरस्काराला ‘यशवंतराव चव्हाण’ यांचे नाव देण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी ग्रामस्वराज्य व लोकशाही मूल्यांचा प्रसार केला. पंचायत राज व्यवस्थेचे समर्थक म्हणून त्यांचे योगदान मोठे होते. ग्रामविकास मंत्रालयाकडून राबविण्यात येणारे यशवंत पंचायत राज पुरस्कारात प्रमाणपत्र, रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पंचायतींचा सन्मानाचे स्वरूप आहे.

मूल्यमापनाची निकषे :

                          स्वच्छता अभियानामध्ये सहभाग 2. पाणी व्यवस्थापन 3. महिला सक्षमीकरण 4. आरोग्य व शिक्षणात सुधारणा 5. डिजिटल व्यवहार ध् ई-गव्हर्नन्स 6. ग्रामसभेचा नियमित व प्रभावी वापर 7. पारदर्शक आर्थिक व्यवहार.

पुरस्काराचे महत्त्व :

                         हा पुरस्कार मिळालेल्या पंचायती आदर्श पंचायत समिती म्हणून ओळखल्या जातात. इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरतात. स्थानिक लोकांना सशक्त करण्यासाठी उत्तम संधी मिळते. यशवंत पंचायत राज पुरस्कार म्हणजे फक्त एक पारितोषिक नसून, तो गावाच्या एकात्म विकासाचे आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील गावांनी हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजेे, कारण तो गावाचा गौरव आणि आत्मसन्मान दोन्ही वाढवतो.
                          पंचायत समितीचे तत्कालीन (2023-24) पदाधिकारी, सदस्य व गटविकास अधिकारी अंशूजा गराटे यांचेसह सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे समर्पित प्रयत्नांमुळे प्राप्त झालेल्या यशामुळे कळमेश्वर पंचायत समितीने केवळ नागपूर जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

                          तहसील कार्यालय कळमेश्वर येथे नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ आशिष देशमुख यांनी पंचायत समिती कळमेश्वरला मिळालेल्या ‘यशवंत पंचायत राज अभियान 2023-24 अंतर्गत राज्यस्तरावर आणि नागपूर विभागातून प्रथम पुरस्कारासाठी पंचायत समिती कळमेश्वरच्या गटविकास अधिकारी अंशूजा गराटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डाॅ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे आदींसह तालुक्यातील नागरिकांसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News