♦ बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा, अमरावतीत शेतमालाची होळी
अमरावती : बच्चू कडू यांच्या शेतकरी प्रश्नांवरील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी चांदूरबाजार आणि तिवसा येथे बुधवारी संपूर्ण बंद पाळण्यात आला. अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची होळी करून सरकारविरोधात निषेध नोंदवण्यात आला.
शेतकरी नेते रविकांत तुपकर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री रासपचे महादेव जानकर यांनी गुरुकुंज मोझरी येथील उपोषण स्थळी भेट दिली. प्रहारच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चांदूरबाजारचे तहसीलदार रामदास शेळके यांना निवेदन देऊन दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला.
बंद दरम्यान चांदूर बाजार आणि तिवसा शहरातील संपूर्ण बाजारपेठ दुपारपर्यंत बंद होती. प्रहारचे तालुकाप्रमुख संतोष कीटुकले यांच्या नेतृत्वात बंद पाळण्यात आला. अमरावतीत बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी परिसरात आंदोलन करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून चांदूरबाजार तालुक्यात प्रहारची विविध आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी तहसील कार्यालयात मुंडन आणि विश्रोळी धरणावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आसेगाव पूर्णा येथील कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले, मात्र प्रशासनाच्या आवाहनानंतर त्यांनी टॉवर सोडला.
तिवसा येथे शहर अध्यक्ष बाळा देशमुख यांच्या आवाहनानुसार सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी केली आहे.
♦ बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चांदूरमध्ये मुंडन आंदोलन
अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी या पुण्यभूमीत बेमुदत उपोषण करणारे माजी राज्यमंत्री तथा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे बेमुदत उपोषण दरम्यान चांदूर बाजार येथे मुंडन व जलसमाधी आंदोलन केले, तर तिकडे अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळाला भेट देत पाठिंबा घोषित केला.
शेतकरी नेते रविकांत तुपकर, आमदार नरेशचंद्र ठाकरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिनेश बूब, वर्धेचे नीलेश कराळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे आदींनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा घोषित केला. राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेला फसवण्याचे काम केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात मोठमोठ्या घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, मात्र अजूनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. उलट उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी एप्रिलअखेर कर्ज भरण्यास सांगितले, म्हणजे तुम्ही नुसत्या घोषणा दिल्या, परंतु त्या पाळल्या नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला भाव, दिव्यांगांना न्याय आदी मुद्दे फक्त कागदावरच आहेत. दुसरीकडे दिव्यांगांचे पैसे लाडक्या बहीण योजनेकडे वळवण्याचे काम चालू आहे. त्यामुळे एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी त्यांच्यासोबत उभा आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी बेमुदत उपोषण सुरू केले.
दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चांदूर बाजार येथील प्रहार कार्यकर्ते व शेतकरी यांनी मुंडन आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या परिसरात हे आंदोलन झाले. यावेळी तालुकाप्रमुख संतोष किटकले यांच्या नेतृत्वात दीपक भोंगाडे, शिवाजी बंड, अरुण गोंडीकर, मुजफ्फर हुसेन, सचिन खुळे, प्रदीप बंड, मुन्ना बोंडे, संदीप मोहोड, गजानन ठाकरे, राहुल खापरे, मंगेश चौधरी, विलास शहाणे, सतीश घोम, रोहित मेंढे, गजेंद्र गायकी, संदीप देशमुख, बाळासाहेब वाकोडे, मनीष एकलारे, सागर निंभोरकर, श्रीकांत धोंडे यांनी मुंडन केले. त्यानंतर तहसीलदार रामदास शेळके यांना निवेदनही देण्यात आले. दुसरीकडे विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पावर मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वात जलसमाधी आंदोलनही केले.
ठाणेदार उल्हास राठोड यांनी दोन्ही आंदोलनाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उपोषणकर्ते बच्चू कडू यांची प्रकृती बिघडली आहे. शुगर वाढली, बीपी वाढला आहे. मात्र सरकारचा एकही प्रतिनिधी इकडे बघायलासुद्धा आला नाही, ही सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. एकेकाळी मंत्री राहिलेल्या व्यक्तीच्या तब्येतीची दखल सरकार घेत नाही, त्यामुळे या सरकारला काय म्हणावे, अशी प्रतिक्रिया कराळे गुरुजी यांनी व्यक्त केली. चांदूरच्या तहसील कार्यालय परिसरात मुंडन करताना प्रहारचे कार्यकर्ते.