♦ लाखो समाजबांधव रस्त्यावर, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
मुंबई : न्यायालयातली सुनावणी होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेने जैन समाजाचे विर्लेपार्ले येथील मंदिरावर तोडक कारवाई केली. त्यामुळे लाखो जैन समाजबांधव रस्त्यावर उतरलेत. विशेष म्हणजे या मोर्चाला कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अलवाणी, जैन समाजाच्या संतांनी पाठिंबा दिला आहे. अखिलेश यादव यांनी सुद्धा या कारवाईवरून भाजपला धारेवर धरले होते.
विलेपार्ले पश्चिम रेल्वे स्थानकापासून अतिशय शांततेत हा मोर्चा निघाला. या मोर्चात प्रचंड संख्येने समाजबांधव सहभागी झालेत. महापालिकेच्या कारवाईविरोधात त्यांनी अहिंसक मार्गाने आपला रोष व्यक्त केला आहे.
नेमके प्रकरण काय?
मुंबईतल्या विलेपार्ले पूर्वमधील कांबळीवाडी येथील 30 वर्ष जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर होते. या मंदिरावर महापालिकेच्या पथकाने 16 एप्रिल रोजी कारवाई केली. महापालिकेने या कारवाईपू्र्वी मंदिराला एक नोटीस पाठवली होती. याविरोधात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 17 एप्रिल 2025 रोजी सुनावणी होणार होती. त्यामुळे मंदिरावर कारवाई करू नका, अशी विनंती लोकांनी आणि भाविकांनी केली. मात्र, ही सुनावणी होण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे जैन समाजबांधव आक्रमक झालेत. त्यांनी अहिंसक मार्गाने आपला रोष आज शनिवारी व्यक्त केला.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन
मंत्री मंगलप्रभात लोढा या आंदोलनात सहभागी झाले आहेत. लोढा यांनी महापालिकेच्या या कारवाईचाही निषेध केला होता. तसेच मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले होते. त्यामध्ये ते म्हणतात की, ‘धर्माचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे!. विलेपार्ले येथील भगवान पार्श्वनाथाचे आमचे पूजनीय जैन मंदिर पाडण्यात आले आहे, ही केवळ एक इमारत नाही तर आमच्या श्रद्धेवर, संस्कृतीवर आणि धर्मावर हल्ला आहे! शनिवार, 19 एप्रिल 2025 रोजी, आपण सर्वांनी या अन्यायाविरुद्ध एकत्र यायचे आहे, आपली एकता दाखवण्यासाठी ही रॅली काढली जाईल. तुम्हीही यात सामील व्हा!, रॅलीची वेळ सकाळी 9 वाजता असेल, असे आवाहन त्यांनी केले होते.