झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ

ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? : डॉ. जयंत नारळीकर

                          भारताच्या प्रगतीच्या आणि वैभवाच्या प्रवासात शास्त्रज्ञांचे योगदान हे सूर्यप्रकाशासारखे आहे. त्यांनी अज्ञानाच्या किर्र अंधाराला दूर सारून देशासाठी विकासाचा मार्ग खुला केला. या मातीत जन्मलेल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या कसोटीवर भारताला जागतिक पटलावर उभे केले. मग तो होमी भाभा यांचा अणुऊर्जेचा पाया असो, विक्रम साराभाई यांचे अंतराळ संशोधनाचे स्वप्न असो, की जयंत नारळीकर यांच्यासारख्या खगोलशास्त्रज्ञाने विश्वाच्या रहस्यांना मराठी माणसाच्या हृदयापर्यंत आणणारी साहित्यसृष्टी असो… या सर्वांनी आपल्या कष्टाने भारताला यशोशिखरावर पोहोचवले. या शास्त्रज्ञांनी केवळ प्रयोगशाळेतच क्रांती घडवली नाही, तर सामान्य भारतीयांच्या मनात कुतूहल आणि स्वप्नांचे बीज रोवले.
                           जयंत नारळीकरांचे गत 20 मे रोजी निधन झाले. त्यांच्या रुपाने भारताच्या वैज्ञानिक नभांगणातील एक तेजस्वी तारा निखळला. विज्ञानाचा ज्ञानवृक्ष उन्मळून पडला. महाराष्ट्राच्या कर्तृत्वसंपन्न पिढीतील एक मौल्यवान मोहरा हरपला. चला तर मग आज धुरंधरमध्ये पाहूया डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचा जीवनप्रवास…
                         ”डॉक्टर जयंत नारळीकर यांनी विज्ञान व साहित्याच्या माध्यमातून भारतीय समाजमानवर अमिट असा ठसा उमटवला. त्यांच्या ‘कृष्णविवर’ सारख्या कथांनी विज्ञानकथांचा पाया मजबूत केला ब्रह्मांडाच्या किर्र अंधारात प्रकाशाची किरणे शोधली. सामान्य माणसाला ब्लॅक होलसारख्या क्लिष्ट संकल्पनेशी जोडण्याचे काम केले.”

वडिलांकडून मिळाले विज्ञान संशोधनाचे बाळकडू

                        जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापुरात 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील विष्णू नारळीकर बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर आई सुमती या संस्कृत विदुषी होत्या. ज्ञान अन् विज्ञान हीच नारळीकर कुटुंबाची जीवनसाधना होती. जयंतरावांना विज्ञान संशोधनाचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. त्यांचे बालपण वाराणसीतच गेले.
                          त्यांचे काका त्यांना गणित व भौतिकशास्त्रातील विज्ञानकथा सांगत. तेव्हा ते तहान भूक विसरून ऐकत. त्यातूच त्यांचे आकाशाशी नाते जडत गेले आणि वैज्ञानिक नारळीकर घडत गेले. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी बीएससीची पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठातून ते एम.एससी (फिजिक्स) पहिल्या क्रमांकाने पास झाले.
                        1959 साली वडिलांसारखेच जयंत नारळीकरसुद्धा इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले आणि गणितातील जागतिक बहुमानाचे टायसन मेडल मिळवले. तसेच ते रँग्लर झाले. इथेच त्यांना त्यांचे खगोल भौतिकशास्त्राचे गुरू डॉक्टर फ्रेड हॉईल भेटले. या गुरूसोबतच नंतर त्यांनी ब्रह्मांडाच्या संरचनेच्या संदर्भात संशोधन करून 1963 साली पीएचडी मिळवली.

रामाच्या राज्यात वीज होती का? हा प्रश्न विचारण्याचे धाडस

                        आधुनिक जगात जे संशोधन होते, ते आपल्या वेद-पुराणांमध्ये यापूर्वीच झाले होते, असा दावा केला जातो. या प्रश्नाला उत्तर देताना नारळीकरांनी एकदा थेट ‘ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का?’ असा उलटप्रश्न केला होता. ते म्हणाले होते, ब्रह्मास्त्र हे एक न्यूक्लिअर डिव्हाईस असल्याचा युक्तिवाद केला जातो. म्हणजे आपल्या पूर्वजांना न्यूक्लिअर फिजिक्सची माहिती असली पाहिजे. आपण हे मान्य केले तर मग त्याला काही पार्श्वभूमी असावी. अर्थात कोणतातरी आधार असल्याशिवाय असे एकदम कुणी ते न्यूक्लिअर फिजिक्स आहे असे म्हणू शकत नाही.
                           ब्रह्मास्त्र न्यूक्लिअर डिव्हाईस होते, तर मग तुम्हाला इलेक्ट्रिसिटी व मॅग्नेटिझम यांचे विद्युतचुंबकीय शास्त्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिझम) याची देखील माहिती असायला हवी. त्याशिवाय न्यूक्लिअर फिजिक्सपर्यंत पुढे जाता येणार नाही. तुम्हाला विद्युतचुंबकीय शास्त्र माहिती होते, तर मग पंखा, दिवे यासारख्या घरगुती वापरासाठी जी वीज लागते ती त्यावेळी होती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
                            सर्व राजकीय पक्ष आजही वीज सर्वांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन देतात. हे सर्व हस्तिनापुरात किंवा रामाच्या राज्यात उपलब्ध होते का? तसे एखादेही उदाहरण कुठे दिसत नाही. त्यामुळे इथे काहीतरी गफलत आहे. अनेक गाळलेल्या जागा आहेत. त्या भरून दाखवा. मगच आम्हाला विश्वास बसेल की पूर्वी हे सर्वकाही आपल्याला माहिती होते.
                        ”आपण कोण, कुठून आलो, ही सृष्टी कुणी आणि कशी निर्माण केली? हे माणसाला पडलेले मूलभूत प्रश्न आहेत. ज्यावर अनेक शतकांपासून विचार सुरु आहे. सुरुवातीला जेंव्हा कुठलेच सज्जड उत्तर सापडले नाही, तेव्हा ही सृष्टी कुठल्यातरी शक्तीने घडवली असे मानले गेले, आणि हा विचार भारतातच नव्हे तर जगभरात मान्य झाला. मग या सृष्टीच्या नियंताचा शोध घ्या, त्याचे पृथ्वीवरील स्वघोषित दूत आले आणि त्यातून जगभरात शोषणाची एक लाटच आली. मग युरोपात नवनिर्मितीचा काळ आला आणि त्याद्वारे सगळ्याच कल्पनांना आव्हान दिले गेले. अर्थात त्यासाठी शास्त्रज्ञांना तत्कालीन धर्मसत्ता आणि कधी कधी राजसत्तेकडून प्रचंड अहवेलना सहन करावी लागली. पण त्यांची चिकाटी संपली नाही. आणि म्हणूनच आज जग ज्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उंबरठ्यावर आहे तिथे पोहचू शकले. नारळीकर आणि त्यांच्या गुरूंनी विज्ञानाच्याच अशा एका कल्पनेला आव्हान देत एक नवा सिद्धांत मांडला.”

ब्रह्मांडाचा सूक्ष्म बिंदूपासून सतत विस्तार होत नाही

                         या अथांग ब्रह्मांडात अनंत नक्षत्र, आकाशगंगा, चंद्र, सूर्य व तारे कसे निर्माण झाले, या विषयावर अनेक शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करत आहेत. ब्रह्मांड निर्मितीच्या संदर्भात 2 प्रमुख सिद्धांत जगजाहीर आहेत. एक जॉर्ज लिमित्रे आणि जॉर्ज गामो यांनी प्रतिपादित केलेला बिगबँग सिद्धांत अर्थात ब्रह्मांडाचे निरंतर प्रसरण होत आहे. दुसरा सिद्धांत फ्रेड हॉएल यांनी दिलेला स्टेडी स्टेट उर्फ अचल स्थिती सिद्धांत. ज्यानुसार ब्रह्मांड स्थिर असून, पूर्वी जसे होते, तसेच ते भविष्यात राहणार आहे. ब्रह्मांड एका स्थिर गतीनेच विस्तृत होत आहे आणि यात सूक्ष्म बिंदूपासून सतत विस्तार होणाऱ्या ब्रह्मांड संकल्पनेला विरोध आहे.
                         डॉक्टर नारळीकरांना बिगबँग सिद्धांत मान्य नव्हता. ते फ्रेड हॉएलच्या क्राझी स्टेडी स्टेट ब्रह्मांडाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या मते, सृष्टी एकसारखीच राहते. सारे नक्षत्र आकाशगंगा व बाकीच्या तत्वांच्या रूपात पदार्थ संपूर्ण निसर्गात सारखाच विखुरला गेला आहे. काही ठराविक आकाशगंगा व अन्य नक्षत्रांच्या गतीमुळे निर्माण होणाऱ्या खाली जागा भरण्यासाठी नवीन पदार्थांची निर्मिती होते. हॉएल – नारळीकर सिद्धांत प्रतिपादित केल्यामुळे नारळीकर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ झाले. यामु्ळे डॉक्टर जयंत नारळीकर हे मराठमोळे नाव महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.

काय आहे स्थिर विश्वाचा सिद्धांत?

                         हॉएल – नारळीकर सिद्धांतानुसार, विश्व हे स्थिर आहे. प्रत्येक वस्तूची स्थिर राहण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यामुळे कोणतेही बाह्यबल वस्तूवर कार्यान्वित झाल्याशिवाय ती अजिबात हलत नाही. बाह्यबल कार्यान्वित झाल्यानंतरच वस्तूची हालचाल होते आणि त्या हालचालीची मात्रा बाह्य बलाच्या मात्रेप्रमाणेच बदलत असते. बाह्यबलाचे वस्तूवरील कार्य बंद झाल्यस ती ज्या गतीने फिरत असेल ती गती कायम राहते. म्हणजे एकंदरीत प्रत्येक वस्तूमअध्ये हालचाल निर्माण करण्यासाठी बाह्यबल आवश्यकच असते. आहे त्याच स्थितीत राहणे हाच सर्व जडवस्तूंचा गुणधर्म असल्याचे स्पष्ट होते. या गुणधर्माला -वस्तूचे जडत्व असे म्हणतात.
                         हे जडत्व वस्तूच्या वस्तूमानावर अवलंबून आहे. अशा वस्तूमानाला त्या वस्तूचे जडत्वजन्य वस्तूमान (इंटरनल मास) असे म्हणतात. प्रत्येक पदार्थकणाला असे जडत्वजन्य वस्तूमान असून, त्या विषयीचा उहापोह हॉईल – नारळीकर सिद्धांताने केला आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक पदार्थकणाचे जडत्वजन्य वस्तूमान त्याच्या सभोवतालच्या सर्व कणांच्या वस्तूमानाशी निगडीत असते. (संपूर्ण विश्वात फक्त एकच कण आहे अशी कल्पना केली तर त्या सर्वालिप्त कणाचे जडत्वजन्य वस्तूमान शून्य राहील.) हे जडत्वजन्य वस्तूमान काढण्यासाठी सर्व कणांच्या एकूण वस्तूमानाला एका युग्मक स्थिरांकाने गुणायला हवे. हा युग्मक स्थिरांक वैश्विक युगकालावर अवलंबून असल्याचे मानले जाते. या सर्व बाबी लक्षात घेऊन गुरूत्वीय स्थिरांक ‘G’ काळानुसार बराच कमी होत असल्याचा एक महत्वाचा निष्कर्ष हॉईल – नारळीकर सिद्धांताने काढला जातो.

विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे?

                         नारळीकर मी शास्त्रज्ञ कसा झालो? या पुस्तकात म्हणतात, आत्मविश्वास ही गुरूकडून शिष्याला मिळू शकणारी सर्वात महत्वाची देणगी आहे. आजच्या आपल्या शिक्षणपद्धतीत ही देणगी दुर्मीळ झाली आहे. पाठांतर करून, विषय समजल्याशिवाय शिक्षकाने सोडवून दिलेले प्रश्न जसेच्या तसे उतरवून विद्यार्थ्यास हा आत्मविश्वास मिळत नाही. स्पेशल क्लासेसला जाऊन परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत हे शिकूनही तो मिळत नाही. ज्या प्रमाणे पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकता येत नाही, त्याचप्रमाणे अभ्यासक्रमातले प्रश्न स्वतः सोडवण्याची ऐपत आल्याशिवाय विषय समजत नाही.
”प्रतिभावंत विद्यार्थ्यांना चमच्यांनी ज्ञान भरवण्यापेक्षा त्यांच्यामध्ये जिज्ञासेपायी ते स्वतः मिळवण्याची उत्कंठा उप्तन्न करणे आणि त्यासाठी धडपड करण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांबरोबरच पुस्तकांनाही गुरू मानले पाहिजे.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News