दिव्यांगांचे मंत्रालयासमोर आंदोलन

बच्चू कडूंच्या आंदोलनाचा चौथा दिवस

प्रकृती बिघडली, मनोज जरांगेंनी घेतली भेट

अमरावती | मुंबई : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांचे अमरावतील अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी प्रहारच्या दिव्यांग कार्यकर्त्यांकडून मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना अटक केली. तिकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांची उपोषणस्थळी भेट देत तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करण्याची मागणी सरकारकडे केली.
                        शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अन्नाचा कणही पोटात न गेल्याने बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असून सुमारे 3 ते 4 किलो वजन घटले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज बच्चू कडू यांची आंदोलनस्थळी भेट घेतली.

मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांची उपोषणस्थळी भेट

                        बच्चू कडू आपल्या गोरगरीबांसाठी अनेक वर्षांपासून मोठ्या ताकदीने आणि हिमतीने संघर्ष करत आहेत. बच्चू भाऊंनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आंतरवालीत येऊन ते मला तब्येतीची काळजी घेण्यास सांगतात. मी इथे येऊन त्यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगतो. बच्चू भाऊंनी अन्नत्याग आंदोलनाचे माझे हत्यार उगाच घेतले. तुमचे पहिले हत्यार चांगले होते, असे मनोज जरांगे म्हणाले.

न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते

                       बच्चू भाऊ एकटे नाहीत. इथे प्रत्येक जण येत असेल. भाषण ठोकून जात असेल. पाठिंबा देत असतील. ही प्रथा या राज्याची अगोदर मोडली पाहिजे. प्रत्यक्ष रस्त्यावर प्रत्येकाने उतरले पाहिजे. कुठल्या बाबतीत न्याय मिळवायचा असेल, तर प्रत्यक्षात रस्त्यावर यावे लागते. आज बच्चू भाऊ आपल्यासाठी जीव द्यायला तयार असतील, तर समाजाने सगळ्या शेतकरी ताकदीने रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
                      सर्वात आधी आपण शेतकरी आहोत. ओबीसी, मराठा हे सर्व घरी गेल्यावर. इथे जात-पात आणायची नाही. आपण सर्व शेतकऱ्यांचे पोर आहोत. एकजुटीने आपण लढले पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

  • शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी.
  • दिव्यांग व विधवा महिलांना रु. 6000/- मानधन देण्यात यावे.
  • आपत्कालीन संकटमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करून देण्यात यावे तसेच शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान देण्यात यावे.
  • दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिबृत्तानुसार शासन निर्णय काढण्यात यावे.
  • वंचित घटकांना वगळता सर्व गोरगरीब समांतर राहणाऱ्या व सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या व सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावे.
  • शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान रु. 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे.
  • आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून रु. 10 लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
  • रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावे तसेच फळपीकांत 3:5 प्रमाण लागू करून MREGS मध्ये जोडण्यात यावे. दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात रु. 1000/- मजुरी दिली जावी.
  • संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी.
  • शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी.
  • 100% दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत 5% आरक्षण देण्यात यावे.
  • शासकीय नोकर भरतीत इतर मागास प्रवर्ग (OBC) चे आरक्षण 27% ठेवावे.
  • शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा. विमा हप्त्याचे 50% पेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे.
  • शेतकऱ्यांना खत, बियाणे विनाशुल्क द्यावे.
  • शेतीसाठी लागणाऱ्या वीजेचे बील माफ करून सतत वीजपुरवठा करण्यात यावा.
  • शेतमालास हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी.
  • धनगर समाजाचे आरक्षण तत्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावे

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News