महागाव : सध्याची स्थिती पाहता या सरकारकडे फुकटच्या योजनांसाठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा नाही असे दिसून येत आहे. दुसरीकडे मात्र विकासाच्या नावावर नको असलेले प्रकल्प आणून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात असेल तर असा विकास शेतकऱ्यांना नकोच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या प्रकल्पांना एकजुटीने विरोध करून हाणून पाडा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
राज्य शासनाने नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्याचे ठरवले असून त्यादृष्टीने काम सुरू केले आहे. या महामार्गामुळे महागाव तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा मेळावा हिवरा (संगम) येथील श्री. एकवीरा देवी संस्थानच्या सभागृहात बुधवारी दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी किसान ब्रिगेडचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते.
यावेळी डॉ. प्रकाश बोपचे, विश्वास लांडगे, रावसाहेब अडकिने, किसनराव कदम, हनुमंतराव राजेगोरे पाटील, साहेबराव पाटील हिवरेकर, पंजाबराव देशमुख खडकेकर, त्रिशुल पाटील, अमोल देशमुख, मनीष जाधव, अमृतराव देशमुख, गोविंदराव देशमुख, दिगंबर पाचकोरे, हरिभाऊ कदम, हरिभाऊ खंदारे हे व्यासपीठावर उपस्थित होते.