मोबाईलशी त्याचे जुळलेले नाते तोडून मातीशी ते नाते जोडण्याचा प्रयत्न करा : ज्ञानेश्वर रक्षक

सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी शिबिर आवश्‍यक : डॉ. अविनाश गावंडे

नागपूर : समाज भौतिक सुखाच्या आहारी गेला आहे. बदलत्या काळानुसार आयुष्य बदलत असून गरजा वाढत आहेत. यामुळे आयुष्यात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. प्रत्येक व्यक्ती स्वतःचे कर्तव्य विसरतो. मात्र आपल्यापेक्षा वरचढ समूहाच्या चुकांचे दोष दाखविण्यासाठी आघाडीवर असतो. यामुळे समाजात स्वार्थी प्रवृत्तीचा सुळसुळाट झाला आहे. तर दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास शरीराच्या आरोग्यावर औषध उपलब्ध आहेत, परंतु सामाजिक आणि मानसिक द्वेषभावनेवर औषध नसल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहे. येणाऱ्या काळात सामाजिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी जात-धर्म-पंथ-संप्रदायापलीकडचे संस्कार मुलांच्या मनावर घडविणे आवश्‍यक आहे, यासाठी मुलांसाठी संस्कार शिबिरांची गरज आहे, त्याच धर्तीवर पालकांसाठी शिबिरांची गरज निर्माण झाली आहे, असे मत मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले.

                          कर्मश्री दुर्गादास रक्षक यांच्या स्मृतिला समर्पित शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी येरला येथील श्री गुरूदेव मानव मंदिर रक्षक बागेत निवासी सुसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या समारोपीय सोहळ्यात पालक आणि शिबीरार्थीना संबोधित करताना मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे बोलत होते. दै. सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे यांच्यासह शिबिर संयोजक ज्ञानेश्‍वर रक्षक यांनी विचार व्यक्त केले.

सकाळचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे म्हणाले, आजही भारताकडे बघताना खेड्यातील आणि शहरातील भारत नजरेत पडतो. तसेच गरीब आणि श्रीमंत अशी दरी दिसते. आजही वंचित घटकांपासून मानवीमुल्य दूर दिसतात. संयुक्त कुटुंब व्यवस्था इतिहास जमा झाली आहे. कुटुंब लहान तसेच मर्यादीत झाली, यामुळे मुलांचे अति लाड वाढले. मुलांनी मागितलेल्या गोष्टी त्यांना सहज मिळतात. आई-वडीलांच्या श्रमाची जाणीव मुलांमध्ये दिसत नाही. यामुळे मुले हट्टी होतात, त्यांचे अति लाड नको तर चागंले काम केल्यास त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या. शिक्षणासोबतच विविध क्षेत्रात त्यांना सिद्ध करण्याची संधी मिळवून द्या, यासाठी अशा सुसंस्कार शिबिरांची गरज आहे.
                          शिबीरात भन्ते संघरत्न माणके, डॉ. अन्वर सिद्धकी, दिनबंधू संस्थेचे नितीन सरदार, दिव्यांग खेळाडू इस्थर कुजूर, पुष्पा रक्षक यांनी शिबीरार्थीशी संवाद साधला. शिबीराच्या समारोपीय सोहळ्यात प्रशांत हाडके, रामजी जोगराना, वैशाली काळबांडे उपस्थित होते. शिबिराचे प्रशिक्षक म्हणून छाया मानव, मुकेश कोल्हे, तुलसीदास झुंजुरकर, प्रज्वल टोंगे यांनी सेवा दिली. यावेळी शिबीरातील मुलामुलींच्या कलागुणांचे सादरीकरण झाले. आदर्श विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करून राष्ट्रसंत लिखित राष्ट्रवंदनेने शिबीराचा समारोप करण्यात आला.


                        ”पालकांनी मुलांवर अभ्यासाचे ओझ लादण्यापेक्षा, समाज कसा वाचावा, याची शिकवण द्या. मोबाईलशी त्याचे जुळलेले नाते तोडून मातीशी ते नाते जोडण्या प्रयत्न करा. मैदानी खेळात त्यांना रमू द्या. आजोबा आजीच्या सानिध्यात त्यांना प्रेमाचा ओलावा कसा मिळेल याकडे लक्ष द्या. केवळ पुस्तकी ज्ञानातून मुल-मुलीना बाहेर काढून व्यवहारिक ज्ञान द्या” :  ज्ञानेश्वर रक्षक


                         शिबिर संयोजक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक म्हणाले, वर्तमानात संस्काराची साधने झपाट्याने बदलत आहेत. आजी, आजोबांकडून अनुभवाचे मिळणारे सुसंस्कार इतिहास जमा झाले. चित्रपट, दूरदर्शन, लॉपटॉप, मोबाईल ही ज्ञानार्जनाची साधने बनली. यामुळे मानवी मनात विकृती निर्माण होण्यास सुरवात झाली. मानवी मुल्यांचा ऱ्हास होत आहे. अशावेळी पालकांनी मुलांवर अभ्यासाचे ओझ लादण्यापेक्षा, समाज कसा वाचावा, याची शिकवण द्या. मोबाईलशी त्याचे जुळलेले नाते तोडून मातीशी ते नाते जोडण्याचा प्रयत्न करा. मैदानी खेळात त्यांना रमू द्या. आजोबा आजीच्या सानिध्यात त्यांना प्रेमाचा ओलावा कसा मिळेल याकडे लक्ष द्या. केवळ पुस्तकी ज्ञानातून  मुला-मुलीना बाहेर काढून व्यवहारिक ज्ञान द्या, असेही ज्ञानेश्‍वर रक्षक म्हणाले.

सौजन्य : ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक, मुख्य संयोजक श्रीगुरूदेव सुसंस्कार शिबीर, येरला, जि. नागपूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News