♦ इतर राज्यांमधूनही संत्रा खरेदी करू: बाबा रामदेव
नागपूर: पतंजली फूड-हर्बल पार्क विदर्भातील संत्रा उत्पादक शेतक-यांसाठी वरदान ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणाऱ्यां संत्र्याच्या दर्जेदार कलमा तयार करण्याकरिता पतंजली आणि राज्य सरकार संयुक्तपणे आधुनिक नर्सरी उभारेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मिहान परिसरातील पतंजली फूड-हर्बल पार्कचे उघ्द्घाटन रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पतंजली आयुर्वेद समूहाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण, आ. डाॅ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, कंपनीचे संचालक रामभरण, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, सहव्यवस्थापकीय संचालक आणि मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, प्रकल्पात दररोज ८०० टन संत्र्यावर प्रक्रिया होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संत्रा पुरविण्यासाठी विदर्भात संत्र्याचे एकरी उत्पादन वाढण्याची आवश्यकता आहे. प्रकल्पामुळे संत्रा उत्पादक शेतकर्यांच्या मालाला बाजारपेठ आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. स्पेनच्या एकरी ३०० झाडांच्या तुलनेत नागपुरात एकरात केवळ १०० झाडे असतात. स्पेनमध्ये एकरी ३० ते ३५ टन तर विदर्भात केवळ ४ ते ५ टन संत्र्याचे उत्पादन होते. नवे तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन वाढविणे शक्य आहे असे गडकरी म्हणाले.
https://www.facebook.com/groups/1741935619352152/permalink/3987013988177626/