वडेट्टीवारांचे गुढीपाडव्यावर वादग्रस्त वक्तव्य..

संभाजीराजेंचा खून झाला, त्याचा हा दुसरा दिवस… मी गुढी-बिढी काही उभारत नाही : विजय वडेट्टीवार

चंद्रपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण गुढी-बिढी काही उभारत नाही असे सांगत गुढीपाडव्याच्या सणावर वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा खून झाला, त्याचा हा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आम्ही काय म्हणून आनंदाची गुढी उभारावी? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.
                        सद्यस्थितीत महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर, नागपूर दंगल, कुणाल कामराचे एकनाथ शिंदेंवरील वादग्रस्त विधान आदी विविध मुद्यांवरून वाद सुरू आहे. या वादात आता विजय वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याच्या मुद्यावर केलेल्या विधानाची भर पडली आहे. त्यांनी आपण गुढी-बिढी काही उभारत नाही, असे नमूद करत या प्रकरणी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते म्हणाले, मी गुढी-बिढी काही उभारत नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा खून झाला, त्याचा हा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आम्ही काय म्हणून, आनंदाची गुढी उभारावी? आम्ही या भानगडीत पडत नाही. ज्यांना पडायचे त्यांना पडू द्या.
                         मराठी नवववर्ष केवळ महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही? असा प्रश्नही विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी उपस्थित केला. त्यामुळे त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहर काँग्रेसतर्फे चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात ते बोलत होते.

जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या

                        उल्लेखनीय बाब विजय वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्यासंबंधीच्या विधानावर वाद होण्याची चिन्हे असताना त्यांनी एका पोस्टद्वारे जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या. गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची व उत्तुंग यशाची. नवीन वर्ष तुमच्या जीवनात सूख, समृद्धी व उत्तम आरोग्य घेऊन येवो, असे ते आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत. त्यांच्या या विरोधाभासी विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

मोदींच्या नागपूर दौऱ्यावर केली होती टीका

                       दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा मोदींचा नव्हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या करिष्म्यामुळे झाला ही गोष्ट आत्ता मोदींच्या लक्षात आली आहे. त्यामुळे ते तब्बल 12 वर्षांनंतर संघ मुख्यालयात येत आहेत, असे ते म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News