दादा! आम्हाला क्षमा करा !!

“८ जून २००६ तुकारामदादा गीताचार्यांचा निर्वाण दिवस” त्यांच्या स्मृतिना विनम्र अभिवादन! 

                                        “शासकीय कुठलंही अनुदान नाही. लोकसहभागातून गाव स्वावलंबी करण्याचं अविरत कार्य दादांनी केले. बॅंक अकांऊट नाही, त्यामुळे सेवेचा हीशोब नाही. पुरस्कारासाठी लोकसेवेचे सोंग नाही. कुठले औषध न घेता निसर्गोपचारावर त्यांचा विश्वास ९२ वर्षाचं आयुष्य ते जगले.” त्यांच्या स्मृतिना विनम्र अभिवादन !
                         दादा गीताचार्य तुकारामदादा हे तुमचं नाव अनेक विरोधकांना धडकी भरवणारं होत. कारण तुमच जीवन निस्पृह, त्यागी वाईट प्रवृत्तीनां तुमच्या समोर उभं राहायची हिम्मत नसायची. मला आठवत तुम्ही अड्याळ टेकडी पासून जवळ असलेल्या चोरटी गावात पहिल्यांदा सक्षम ग्रामसभा निर्माण करून गाव गणराज्याचा प्रयोग केला. तेव्हा भाजप-शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात होती.
                         चंद्रपूर जील्ह्यातील सर्व महत्वाचे राजकारणी दादा तुमच्या ‘आमच्या गावांत, आमचं राज्य’ ह्या संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या विरोधात होते. तुमच्या जनजगारणामुळे गाव चेतली होती. गावगणराज्याच्या विचाराने पेटली होती. ग्रामसभेच्या ठरावाशिवाय गावात राजकीय पुढारी, खासदार, आमदार, मंत्री, शासकीय अधिकारी येऊ शकत नव्हते. त्यांना आपण जनतेचे मुनीमजी आहात, मालक नाही. हे अशिक्षीत ग्रामस्थ ठणकावून सांगायचे. ‘आमच्या गावात आम्ही सरकार’, ‘मुंबई-दिल्लीत आमच सरकार’ म्हणजे आम्ही मतदार या देशाचे मालक आहो. ही भावना ग्रामस्थांमध्ये सर्वदूर वाढत होती.
                          १२ मे १९९१ मध्ये चोरटी गावात ब्रम्हपुरीच्या पो. स्टे. चा विलास वांदीले नामक तत्कालीन विचित्र पो. नि. (याने कळमेश्वरातही भयंकर उपद्रव केला होता) याच्या मदतीने राजकीय वरदहस्थाने ग्रामसभेच्या हक्कांना चिरडण्याचा प्रयत्न झाला. ‘चोरटी’ गावाला पोलीस छावणी बनवुन खोटी दमदाटी करून ४१ लोकांना अटक करून चंद्रपूरच्या तुरूंगात ४१ दिवस बंदीस्थ केले. दादा तुमच मार्गदर्शन आणि तुमच्या शब्दांची ताकत ग्रामगीतेचे विचार चोरटी गाव क्रांती करून उठले. ग्रामगीतेचे अध्यायसुध्दा ४१ आहे.
                         चोरटी ग्रामस्थांना अटक, दादा तुम्ही फार अस्वस्थ होते. कारण राजकारण्यांसारखा हा उठाव स्वार्थी नव्हता. गावकल्याणाचा, संविधानाने दिलेल्या अधीकाराचा तो लढा होता. दादा या संपूर्ण लढ्यात मी तुमच्या सोबतीला अनावधानानेच जुळलो होतो. माझ्या व्यवसायाचा शनीवार सुटीचा दिवस, अड्याळ टेकडीला परीवारासोबत आलो होतो. आपण चोरटीच्या ग्रामसभेला सायकलवर एका ग्रामस्थासोबत जाणार. मी आपणास माझ्या गाडीने घेऊन गेलो. चोरटीची ग्रामसभा अनुभवली, चोरटी ग्रामस्थांवर ‘पारधी’ आडनावाच्या कुटुंबाने धानाची गंजी जाळल्याचा खोटा आरोप लावला होता. ग्रामसभेत त्यांना बोलावले तो परीवार हजर नव्हता. कारण तो खोटा डाव राजकीय दबावात रचला होता.
                         दादा ‘चोरटी’चा न्यायहक्काचा लढा त्या काळात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात गाजला. आधी प्रसिद्धी माध्यम बोलले नाही. पण ‘गजानन जानभोर’ नावाच्या पत्रकाराच्या लेखनीने सार्यांनाच जागे केले. त्या न्यायासाठी लढतांना तुमची अस्वस्थता मला जाणवत होती. नागपूरच्या पत्रकार परीषदेत पत्रकारांनी तुमचे म्हणने न ऐकता न समजून घेता बहीष्कार टाकला होता. नंतर त्याच पत्रकारांना तुमचं महत्व कळले होते. तुमच्या मुलाखतीसाठी पत्रकार फोन करायचे. दादा तुमच्या कार्यकतृत्वाचं महत्व त्यांना उशीरा कळले. मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दिग्वीजयसींग तुम्हाला गुरूस्थानी मानायचे. तुमच्या शब्दावर त्यांनी ग्रामसभेला मथ्यप्रदेशात विशेष अधिकार दिले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर. आर. पाटील तुमच्या प्रेमात होते. अनेक प्रसंगी ते तुमच्याशी चर्चा करायचे.
                         दादा तुमचं व्यक्तीमत्व महान असल्याचं गुरूदेव चळवळीला तुमच्या हयातीत कधीच कळले नव्हते. गुरूकुंजातील सत्ताधारी नेहमीच तुमच्या विरोधात असायचे. कुर्हा (चांदुरबाजार) तुमचं जन्मगाव, याच् गावांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली शाळा, तुमच्या मार्गदर्शनात उत्तम चालायची. पण तुमच वर्चस्व ज्यांना खपत नव्हतं त्या गुरूकुंजातील सत्ताधार्यांनी तेथे राजकारण केले. तुम्ही त्यांना समजविण्यासाठी गुरूकुलात सर्वाधिकार्यांसोबत बोलावले, त्याचा दादा मी साक्षीदार आहे. त्यांच् तुमच्याशी बोलणं शब्दाची मर्यादा सोडून होते. तुमच्या कार्यकतृत्वाचं तर सोडाच्  पण तुमच्या जेष्ठत्वाचंही त्यांना भान् नव्हतं.
                          पण दादा, आजन्म तुमचा ज्यांनी दुःस्वास केला. तुमचा अपमान करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. ते आज तुमच्या समाधीवर अश्रु गाळतात. दादा! खरच तुमचं मोठंपण त्यांना कळलं असावं का ? दादा! तुमच्या सोबतीला राहलेले महानुभाव आज सत्तेला शरण गेले. लाचार झाले, त्या अस्तीनीतल्या सापांनी अड्याळ टेकडीचं पावित्र्य नासविलं. दादा! तुम्ही कर्मकांडाच्या विरोधात होते. ‘कर्मकांडाच्या पोथ्या पेटवा, हे तुकारामदादांनी सांगीतल्याच सांगा.’ ह्या तुमच्या कणखर शब्दांनी अनेक कुंटुंबातील अंधश्रध्दा-अंधरूढ्या संपवल्या.
                           पण दादा आज तुमच्या वैचारीक विरोधकांच फावलं. तुमचा पुण्यस्मरणदिन तिथीत अडकविण्याचा प्रयत्न सुरू झाला. ग्रामगीतेचे आपण सुरू केलेले अड्याळ टेकड़ीवरचे प्रयोग थांबले. तुम्ही निर्माण केलेले गुरूकुल गुरूकुंजाच्या सत्तेच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाला. दादा तुमच्या विचारांचे, राष्ट्रसंतांच्या विचारांचे, ग्रामगीतेच्या विचारांचे आता आम्हाला महत्व वाटत नाही. कारण तुम्ही निर्माण केलेल्या भुवैंकुंठावर कोणाचं अधीपत्य राहावं, खरे दादा कोण? याचा संघर्ष-गटबाजी सुरू आहे. पोलीस तक्रार, राजकीय हस्तक्षेप, पेपरबाजी सारेच वाह्यात प्रयोग अविरत सुरू आहेत. राष्ट्रसंतांच साहित्य अल्पदरातून लोकांपर्यंत पोहचावे ते साहित्यच कुलुप तोडून चोरीला गेले. पोलीस तक्रार झाली, पोलीसही कंटाळले. दादा तुमच्या हयातीत तुमच्या कुठल्यांच गुरुकुलात कुलुप नव्हते.
                       आता दादा मांडीला मांडी लाऊन बसनार्यांना स्वतःवरच विश्वास नाही. दादा! बापाचं कर्तव्य तुम्ही बजावलं, ग्रामगीतेचे विचार तुम्ही जगले आम्हाला जगणं शिकवलं. पण दादा तुमच्या सहवासाने आम्ही माणसं झालो कां? आज परीस्थीती पाहल्या नंतर दादा, तुमचा विचार आम्ही संपवला, कारण आम्ही तुमच्या विचाराचे वारसदार झालो नाही. दादा! तुम्ही गुरूकुंजातील सत्ता राष्ट्रसंतांच्या शब्दावरून नाकारली. स्वतःच् सेवेच नवं विश्व उभं केलं. आज श्रीगुरूदेव सेवा मंडळाची परिवर्तनीय चळवळ तुम्ही जनमानसात रूजवली, ती संपवण्याचे भागीदार आम्ही ठरत आहोत. दादा आम्हाला क्षमा करा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News