♦ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर;
♦ प्रभागरचनेचे वेळापत्रक आले!
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या माध्यमातून आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने कालावधीनुसार टप्पानिहाय कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, नगर परिषदा तसेच नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या वतीने केला जात आहे. त्यानुसार राज्य सरकारला प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी आता निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या प्रमुखांना नियमबद्ध कार्यक्रम आखून प्रभागाची रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नियमबद्ध कार्यक्रमाच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या असून, त्या कालावधीत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.