मुंबई : देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या अग्निवीर जवान मुरली नाईक यांना शहीद सैनिकाचा दर्जा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही, तर या प्रकरणी हायकोर्टात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकमध्ये निर्माण झालेल्या तणावात मुरली नाईक यांचा 9 मे रोजी नियंत्रण रेषेवर मृत्यू झाला होता. ते घाटकोपरच्या कामराज नगर झोपडपट्टीत राहत होते. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईक यांना शहीद सैनिकाचा दर्जा देण्याची मागणी केली. ते म्हणाले, लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असलेले आणि रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर येथील रहिवासी असलेले अग्निवीर जवान मुरली नाईक यांना सेवेदरम्यान वीरगती प्राप्त झाली.
मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबासाठी कोणतीही ठोस मदत अद्याप जाहीर झालेली नाही. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून अन्यायकारक आहे. सरकारने मुरली नाईक यांच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात जावे लागेल.
ॲड. आंबेडकर म्हणाले, “सैनिकांना ज्या सवलती, मदत आणि सन्मान देण्यात येतात, त्या अग्निवीरांना देखील मिळाल्या पाहिजेत. महाराष्ट्र शासनाने आधीच जाहीर केले आहे की सेवेदरम्यान वीरगती प्राप्त झाल्यास मदतीची तरतूद आहे. मग मुरली नाईक यांच्या बाबतीत अपवाद का?”
ते पुढे म्हणाले, “मी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे आणि लवकरच त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून हा मुद्दा मांडणार आहे. जर यावर सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास मागेपुढे पाहणार नाही.”
वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागण्या
1. अग्निवीर जवान मुरली नाईक यांना अधिकृत शहीदाचा दर्जा द्यावा.
2. त्यांच्या कुटुंबाला तत्काळ एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
3. कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी राज्य सरकारने घ्यावी.
4. शहीद कुटुंबाला सर्व सन्मान आणि शासकीय सवलती लागू कराव्यात.
अग्निवीर जवानांना देखील सैनिकाचा दर्जा आणि सोईसुविधा देण्यात याव्यात यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहून जनतेने अग्निवीर जवान आणि त्यांच्या कुटुंबाच्या न्यायासाठी आवाज उठवावा, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले आहे.