करुणा व धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच:त्यांनी दोन मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही; कोर्टाचे निरीक्षण
मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिलेत. कोर्टाने या प्रकरणी मुंडे यांनी दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशांना दिलेली आव्हान याचिका फेटाळून लावली. करुणा व धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत. या दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण कोर्टाने यासंबंधी नोंदवले आहे.
मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने गत 4 फेब्रुवारी रोजी धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मुंडे यांनी या आदेशांना सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यात त्यांनी आपण करुणा शर्मा यांच्याशी लग्न केले नसून, त्यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होतो असा दावा केला होता. पण कोर्टाने या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आत्ता कोर्टाचा विस्तृत आदेश पुढे आला आहे.
करुणा यांच्या मुलांना नेत्यांच्या मुलांसारखी जीवनशैली मिळावी
धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत. करुणा व धनंजय यांच्यातील संबंध लग्नासारखे आहेत. त्यांनी दोन मुलांना जन्मही दिला आहे. एकाच घरात राहिल्याशिवाय हे शक्य नाही. एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशांत म्हटले आहे.
कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळवण्यासाठी लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक नाही, तर संबंधांचे स्वरुप महत्त्वाचे असते, अशी पुस्तीही कोर्टाने या प्रकरणी जोडली. मुंडे यांनी करुणा यांचे वैवाहिक अधिकार फेटाळणे हे भावनात्मक हिंसाचाराच्या श्रेणीत येते. त्यामु्ळे करुणा यांना उदरनिर्वाह भत्ता व इतर दिलासा मिळाला पाहिजे, असेही कोर्ट या प्रकरणी म्हणाले आहे.
धनंजय मुंडेंनी काय केला होता युक्तिवाद?
धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाच्या सुनावणीत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केले नसल्याचा दावा केला होता. मी करुणा शर्मा यांच्यासोबत केव्हाही लग्न केले नाही. माझी व त्यांची ओळख एका राजकीय पक्षाच्या बैठकीवेळी झाली. त्यानंतर आमच्यात वैयक्तिक संबंध निर्माण झाले. या नात्यातून आम्हाला दोन मुले झाली. या मुलांना मी माझे नाव व आडनाव वापरण्याची परवानगी दिली. पण मी केव्हाही करुणा यांच्याशी विवाह केला नाही. माझा केवळ राजश्री मुंडे यांच्याशी कायदेशीर विवाह झाला आहे, असे ते म्हणाले होते.