February 7, 2026 2:44 pm

काँग्रेस नेते राहुल गांधी आज मुंबईतील धारावीत 

♦ धारावीतील छोट्या उद्योजकांशी साधणार संवाद.. 

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आहेत. ते आज धारावी येथील चर्मोद्योग व्यावसायिकांसह इतर छोट्या उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधी यांचे आज सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

                         धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी आधीच राज्यातील महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा होत असताना राहुल गांधी थेट धारावीत येणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ठाकरे गटासह धारावीवासियांचाही विरोध आहे. राहुल गांधी यांनी आज धारावीत भेट देत तिथल्या मजुरांशी, व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत.

राहुल गांधींचा मुंबई आणि अहमदाबाद दौरा खालीलप्रमाणे

  • 6 मार्च रोजी सकाळी 9:00 – 11:10 वाजेदरम्यान एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून मुंबईत येणार.
  • आज ते धारावीतील छोट्या उद्योगांशी संवाद साधणार.
  • त्यानंतर बाकीचा दिवस राखीव आणि ट्रायडंट, बीकेसी येथे रात्रीचा मुक्काम करणार.
  • 7 मार्च रोजी सकाळी 8:55 वाजता राहुल गांधी मुंबईहून इंडिगोच्या विमानाने अहमदाबादला पोहोचतील. तिथे ते गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटी (GPCC) च्या नेत्यांसोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतील. त्यांचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे:
  • 10:35 – 11:00 : माजी पीसीसी अध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक.
  • 11:00 – 13:00 : राजकीय व्यवहार समितीची बैठक
  • 14:00 – 15:00 : जिल्हा काँग्रेस अध्यक्षांशी चर्चा
  • 15:00 – 17:00 : ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांसोबत बैठक

                       8 मार्च रोजी राहुल गांधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी गुजरातमधील पक्ष कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना भेटतील. ही बैठक सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 पर्यंत चालेल. यानंतर, ते दुपारी 1:45 वाजता एअर इंडियाच्या विमानाने अहमदाबादहून दिल्लीला रवाना होतील आणि दुपारी 3:30 वाजता दिल्लीला पोहोचतील.

धारावीवासियांमध्येही पुनर्वसनासह इतर मुद्यांवर आक्रोश

                        धारावी पुनर्विकास प्रकल्प मुद्यावर राहुल गांधी हे सुरुवातीपासून आक्रमक आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला शिवसेना ठाकरे गटानेही विरोध केला आहे. तर, स्थानिकांमध्येही पुनर्वसन आणि इतर मुद्यांवर आक्रोश आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना चांगली घरे, पायाभूत सुविधा मिळणार असल्याचा दावा करण्यात येणार आहे. धारावीत चर्मोद्योगासह इतरही विविध लघुउद्योग आहे. धारावीत अब्जावधींची उलाढाल होत असते. त्यामुळे या लघुद्योगांचे पुनर्वसन कुठे करणार, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर, स्थानिकांमध्ये पात्रतेच्या मुद्यावर चिंता समोर येत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News