सामुदायिक ध्यानातूनच दररोजच्या कामाची सकारात्मक ऊर्जा मिळते- लक्ष्मणदास गमे
तिवसा : सामुदायिक ध्यान हे एक आत्मशुद्धी केंद्र असून या ध्यानातून दररोजच्या कामाची ऊर्जा मिळते. संस्कारित मुले निर्माण करण्यासाठी देखील सामुदायिक ध्यान ही एक तत्वप्रणाली असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे व आत्मशुद्धी करावी, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्णदास गमे यांनी केले.
मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ११६ वा जन्मदिवस अर्थात ग्रामजयंती महोत्सवाच्या तिर्थस्थापणेप्रसंगी ते बोलत होते. सोमवारी २८ एप्रिल रोजी श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम (मोझरी) येथे राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ झाला. सर्वाधिकारी लक्ष्मणदास गमे व मालाताई गमे यांच्या हस्ते अभिषेक, पूजन करून तिर्थस्थापना करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या संवादादरम्यान राष्ट्रसंतांचे विचारधन मांडले गेले.
ते पुढे बोलताना म्हणाले, सामुदायिक ध्यान ही सर्वांचे कल्याण करणारी साधना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्यासाठी ती मुद्दामहून निर्माण केली. त्यामुळे तिचा लाभ समस्त मानवजातीने घेतला पाहिजे. आपल्या संबोधनाच्या शेेवटी गमे यांनी काही चिंतनही केले. प्रारंभी पहाटे ५ वाजता राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे अभिषेक, पूजन करण्यात आले. दरम्यान आगामी ३० एप्रिल रोजी सकाळी ६ ते ८ या वेळात पालख्यांची मिरवणूक व प्रतिमेची शोभायात्रा निघेल.
ग्रामजयंती महोत्सवात मंगळवारी २९ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता सामुदायिक ध्यान व ग्रामगीताचार्य प्रा.अरविंद राठोड यांचे चिंतन होईल. सकाळी ६ वाजता ग्रामसफाई होईल. सकाळी ८ ते ९ या वेळात गुरुमाऊली महिला भजन मंडळ तर ९ ते १० या वेळात श्रीगुरुदेव महिला भजन मंडळ गुरुदेवनगर यांचा खंजेरी भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ ते ७.४५ या वेळात पुन्हा सामुदायिक प्रार्थना व महासमाधी औक्षण होईल. यावेळी संचालक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई बोंडे या मार्गदर्शन करतील. रात्री ७.४५ ते ८.३० वाजता प्रा.जयश्रीताई सोनारे ह्या ‘अवघा रंग भक्तीचा’ हा कार्यक्रम सादर करतील. रात्री साडे ८ ते १० या वेळात आजीवन प्रचारक लक्ष्मणदास काळे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल.
