ग्रामगीताचार्य स्मिता धर्माळे व जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे यांचा सत्कार

संत विचाराने असाध्य कार्य साध्य होते- गोपालराव देशमुख यांचे प्रतिपादन

काटा वृत्तसेवा
पुसद :  महाराष्ट्र भूमीत अनेक संत महापुरुष झालेत त्यांनी अनंत उपकार केलेत सर्वांच्या उद्धारासाठी चंदनाप्रमाणे झिजले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमुर्ती गाडगे महाराजांनी विदर्भ भूमीत जन्म घेतला व जगाचे कल्याण केले. या संत विचारांना आत्मसात केल्याने जिवन बदलते. आज एक विवाह करताना किती तारांबळ उडते याची सर्वांना जाणीव आहे. त्यात शिस्तबद्ध आयोजन व उत्तम नियोजन करुन पन्नास विवाह निर्विघ्नपणे पार पाडणे अतुलनीय व असाध्य कार्य आहे. हे केवळ संत विचाराने साध्य झाले असे मला वाटते असे प्रतिपादन गोपालराव देशमुख यांनी केले.

                          गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूर येथील प्रार्थना स्थळी गुरुदेव उपासकांनी मध्यवर्ती प्रतिनिधी ग्रामगीताचार्य स्मिता धर्माळे व जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे यांच्या सत्काराचे आयोजन २२ मे रोजी करण्यात आले होते. मागील पंधरा वर्षांपासून गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूर व ग्रामपंचायत श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुसंस्कार शिबीर, किर्तनमाला व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो.
                          यावर्षी या विवाह सोहळ्यात पन्नास विवाह पुर्ण झाले. त्यात मुख्य आयोजक धर्माळे सपत्नीक कार्याला वाहून घेतात. त्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून पुजालता व प्रमोद देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी धर्माळे म्हणाले की, गुरुदेव कृपा, आईचा आशिर्वाद, आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य होते त्यामूळे या सामाजिक कार्यात जेवढे सहभागी होतात त्या सर्वांचा हा सन्मान होय. भविष्यातही असेच सहकार्य लाभो ही गुरुदेव चरणी प्रार्थना करुन लोक सहभागातून हे कार्य अविरत सुरू आहे व राहील. यावेळी त्यांनी हा सन्मान त्यांच्या मातोश्री कुसूमआई यांना समर्पित केला.
                        सत्कार प्रसंगी सप्तखंजिरी वादक राष्ट्रिय किर्तनकार भिमराव महाराज अशोक भगत महाराज, अनील अस्वार, सुभाष जाधव, दशरथ सोनटक्के, बाबासाहेब वाघमारे, शिवशंकर नागरे, पोलीस पाटील पंडित आडतकर, गजानन कवाने, यशवंत देशमुख, शामराव देशमाने, यशवंत भगत, सुरेश कदम, पुंडलीक भालेराव, शंकर सोळंके, कैलास मस्के, सुभाष कदम, नरेंद्र गेडाम, विठ्ठल यावले, पंजाब गडदे, सूरज केळकर, ग्रामगीताचार्य मुक्ता काळबांडे, रंजना किन्हेकर, शोभा सोनारे, लता देशमुख, प्रतिभा निस्ताने वअसंख्य गुरुदेव भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देवश्री काळबांडे, तर आभार शिक्षीका नेहा आडतकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News