‘EWS हवं, ओबीसी हवं, SEBC हवं, सर्व काही एकाच समाजाला’
मुंबई : एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. EWS पाहिजे, ओबीसी पाहिजे, आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी-मधून फायदा पाहिजे महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही? जरांगे पाटील यांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे बरोबर नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, मनोज जरांगे यांनी आम्हा ओबीसीमधील 374 जातींच्या लोकांना संपवून टाक म्हणावे मारून टाका म्हणावे गळा घोटून. आमच्या ओबीसींच्या 12 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाज मोठा आहे म्हणून जी काय दादागिरी त्यांच्या ताकदीच्या भरवशावर जर आम्हाला धमकावत असेल तर घ्या बंदुका ताकद आहे ना? तलवारी घेऊन माना छाटून टाका आमच्या म्हणजे त्यांना समाधान होईल.
ओबीसींवर अन्याय करणारा जी आर सरकार रद्द करावा : विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या दबावात ओबीसी समाजाचा गळा घोटात आहे. सरकारने काल बोलावलेल्या बैठकीत आम्हाला अपेक्षा होती की, ओबीसींवर अन्याय करणारा जी आर सरकार रद्द करेल. त्याबरोबर इतर काही मागण्या होत्या, परंतु ओबीसी समाजावर 2 ऑक्टोबरचा जी आर असंवैधानिक आहे आणि तो ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे तो रद्द करावा, अशी सगळ्यांची प्रमुख मागणी होती. यामध्ये ओबीसी समाजाचे 50 प्रतिनिधी होते आणि सर्वांची एकमुखाने हीच मागणी होती.
समाजात दुही निर्माण होईल असे वडेट्टीवार यांनी : मनोज जरांगे
मनोज जरांगे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्याकडून चुकीचे स्टेटमेंट जाऊ लागले आहेत. समाजात दुही निर्माण होईल असे पाऊल वडेट्टीवार यांनी उचलू नये. कुठे असे बोलू नये की जरांगे पाटील यांच्या हाती बंदूक देऊन ओबीसी समाजाला मारा असे शब्द विरोधी पक्षनेता राहिलेल्या व्यक्तीने बोलायचे हे काही योग्य नाही. इतका पश्चात्ताप करण्यापेक्षा वडेट्टीवार यांनी गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा तळतळाट घेऊ नये.
![]()