दहावी बोर्डाचा निकाल जाहीर : यंदा 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण

पुन्हा कोकण अव्वल, मुलींचीच बाजी;

निकाल कुठे आणि कसा पाहावा?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वा. बोर्डाने निश्चित केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. बारावी बोर्डाचा निकाल गत आठवड्यातच जाहीर झाला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 21 फेब्रुवारी- 17 मार्च 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदा राज्यात दहावी परीक्षा निकाल 94.10 टक्के लागला आहे.
                      फेब्रुवारी-मार्च 2024 च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल 1.71 टक्केने कमी आहे. परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंडळाचे सचिव देविदास कुलाळ ,सहसचिव मेधा निरफारके, सहाय्यक सचिव सीमा रांगडे,लेखाधिकारी शैलेंद्र पाटील, गणतंत्र व्यवस्थापक हेमंत राजपूत उपस्थित होते.
                       गोसावी म्हणाले की, या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 आहे.
                         या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 28,512 खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28,020 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36 आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 24,376 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23,954 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 9,448 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 39.44 आहे.

8,844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

                       या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खासगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण 16,10,908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,98,553 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,87,399 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04 आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,585 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 8,844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.27 आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

  • सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (98.82 %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (90.78%) आहे.
  • सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 92.31 आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83 ने जास्त आहे.
  • माध्यमिक शालान्त (इ.10 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 करीता एकूण 62 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण 24 विषयांचा निकाल 100% टक्के लागला आहे.
  • राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 4,88,745 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 4,97,277 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 3,60,630 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 1,08,781 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
  • राज्यातील 23,489 माध्यमिक शाळांतून 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,924 शाळांचा निकाल 100% लागला आहे.

कुठे पाहता येईल निकाल?

  • https://results.digilocker.gov.in
  • https://sscresult.mahahsscboard.in
  • http://sscresult.mkcl.org
  • https://results.targetpublications.org
  • https://results.navneet.com
                          विद्यार्थ्यांना उपरोक्त संकेतस्थळांवर विषयनिहाय संपादित केलेले गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रतही (प्रिंट आऊट) घेता येईल. विशेषतः शाळांना https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

निकाल पाहण्याची प्रक्रिया:

  • वरीलपैकी कोणत्याही अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • “SSC Examination March – 2025 Result” या लिंकवर क्लिक करा.
  • आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
  • “View Result” वर क्लिक करा.
  • आपला निकाल स्क्रीनवर दिसेल; त्याची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट घ्या.

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा?

                         मंडळाने विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक 14 मे ते 28 मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचीही मुभा उपलब्ध करून दिली आहे. पण त्यासाठी त्यांना योग्य ते शुल्क भरण्याची सूचना केली आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे, शुल्क भरणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
                        यंदाच्या दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु. मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुरवणी परीक्षा अर्जांबाबत

                        राज्य मंडळातर्फे जून-जुलै 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक 15 मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यंदा किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते?

                          यंदा दहावीच्या परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली, तर 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती.

11 वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार

                          दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांना अकरावीच्या प्रवेशासाठी तयारी करावी लागते. यासाठी त्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात. पण मंडळाने यंदा त्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची माहिती बोर्डाने एका प्रसिद्धीपत्रकाराने यापूर्वीच दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News