धामणगाव रेल्वे येथील २८ वर्षीय रजत श्रीराम पत्रे यूपीएससीत देशातून ३०५ वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण

रजत पत्रेने आयडीवर जुना फोटो लावून गमावली होती संधी‎, 2 वर्षांपूर्वी फोटोमुळे अपयश

अमरावती : यूपीएससी २०२३ मध्ये मुख्य परीक्षेत उत्तम गुण होते. त्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलो. मुलाखतीच्या पूर्वी ओळख पत्रावर स्वत:चा फोटो चिकटवणे आवश्यक आहे, त्यामुळे मी माझा फोटो लावला, त्या फोटोत माझी दाढी, मिशी वाढली होती. दरम्यान मुलाखतीला गेलो, तज्ज्ञांच्या पॅनलसमोर माझी मुलाखत सुरू झाली. ज्या बाबीचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असे त्यावेळी घडले आणि डोळ्यासमोर दिसणारे यश क्षणात नाहीसे झाले. कारण ओळख पत्रावर माझा दाढी, मिशी असलेला आणि पाच वर्षांपूर्वीचा फोटो होता. मात्र मुलाखतीला मी दाढी, मिशी काढून ‘क्लिन शेव्ह’ गेलो होतो. नेमकं माझ तेच चुकलं आणि ओळखपत्रावरील फोटो माझाच असूनही ‘तो तू नव्हेच’ असे समोरच्या तज्ज्ञांनी म्हटले आणि मला नोकरी मिळण्याऐवजी त्यावेळी चौकशीला सामोरे जावे लागले.
                        मात्र त्या घटनेतून मोठा धडा घेतला, पुन्हा चिकाटीने तयारी केली आणि सोमवारी (दि. २२) लागलेल्या निकालात यूपीएससीत देशातून ३०५ वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालो, असे धामणगाव रेल्वे येथील २८ वर्षीय रजत श्रीराम पत्रे यांनी सांगितले. रजत यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण धामणगावातच झाले. त्यानंतर पुण्यात अकरावी, बारावी पूर्ण केले. तसेच भूगोलात पदवी मिळवली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्ली गाठले. पदव्युत्तर शिक्षणासोबतच यूपीएससीची तयारी सुरू केली. याचदरम्यान नेट उत्तीर्ण केली. सुरुवातीला एक, दोन प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र आता तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले आहे.
                         दिल्लीत यूपीएससीच्या तयारीसोबतच मागील तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून ते काम करत होते. यंदा मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे मुलाखतीचीही भक्कम तयारी केली होती आणि या वेळी मुलाखतीतही चांगले गुण मिळाल्याचे सोमवारी निकालाअंती समोर आले. या परीक्षेत त्यांना ३०५ वी रँक मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. आपल्याला ४०० ते ५०० मध्ये रँक मिळेल अशी अपेक्षा असल्याचे रजत म्हणाले. मात्र मुलाखतीत चांगले गुण मिळाल्यामुळेच हे यश मिळाल्याचे आता नक्की झाले आहे.
                         दरम्यान आपण यूपीएससी उत्तीर्ण झालो, ही माहिती धामणगावला कुटुंबीयांना फोनद्वारे दिली, त्यावेळी आईवडिलांसह इतरांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, मलाही प्रचंड आनंद झाला. मागील अनेक वर्षांपासून केलेल्या श्रमाचे फळ मिळाले आहे. दोन वर्षांपूर्वी मुलाखतीच्या फोटोमुळे मला प्रचंड त्रास झाला. दरम्यान त्यावेळेपासून यूपीएससीने मुलाखतीला पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या दहा दिवसांपूर्वी काढलेला फोटो लावणे अनिवार्य केले असल्याचेही रजत यांनी सांगितले.
मुलाखतीच्या १० दिवसांपूर्वी काढलेला फोटो अनिवार्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News