दहावी आणि बारावी मेरीट आलेली मुले पुढे काय करतात ?
1975-76 वर्ष असेल त्याच दरम्यान एसएससी आणि एचएससी बोर्ड गाजावाजा करीत आले. मला वाटतं त्याआधी आठवी पासूनच आर्ट, काॅमर्स, सायन्स, मग प्री नंतर तीन वर्ष ग्रॅज्युएट, नंतर पुढचे शिक्षण. नवीन शिक्षणपद्धतीने अभ्यासक्रम खुप धडकी भरवून विद्यार्थ्यांना ट्युशनच्या नादी लावले.
दहावी, बारावीचा निकाल त्याचे बाजारीकरण, त्याकाळातील वर्तमानपत्र खुप प्रसिद्धी द्यायचे. पहिल्याच दिवशी निकाल कळावा म्हणून वर्तमानपत्राच्या कार्यालयातील चकरा जणू यात्राच असायची. मला आठवते माझा दहावीचा निकाल परिक्षा क्रमांक हरवला. परिक्षा सुरू असतांना दुसर्यांदा घेतलेला. म्हणजे माझा गबाळपणा लक्षात येईल. घरात शिक्षणाचा अभाव हे सर्वच बहुजनांच्या घरातील तेव्हाचे चित्र. दहावी पास होण्याचे लक्षण कमीच. कारण इंग्रजी भाषेच दुःख. बीजगणीताची बोंब, पण भूमिती बर्यापैकी. इतर विषयात पासींग मार्काची शाश्वती होती. असा शिक्षणाचा प्रवास निकालाच्या पहिल्या दिवशी निकाल बघायला अनेकांच्या चकरा शहरभर, मी मात्र शांत, स्थिर होतो.
निकालाच्या दिवशी वर्तमानपत्र सकाळी हातात. पण परीक्षाक्रमांकच माहीत नव्हता. सकाळी अकरा-बारा नंतर शाळेत निकाल भेटणार. मी बिनधास्थ शाळेत पोहचलो. जवळ जवळ चाळीस विद्यार्थी आम्ही सक्करदरा विद्यालयातून दहावीची परिक्षा दिली. पाच विद्यार्थी पास झाले त्यात मी एक होतो. पहिल्याच झटक्यात थर्ड डिवीजन घेऊन पास. पण सारे घर आनंदी. महाविद्यालयीन जीवनात बसता उठता परीक्षा देणे सुरू, एटीकेटीचा मध्येच टेकू आला. थर्ड क्लासमध्ये बीकाॅम पदवीधर, बापाला स्वाभीमान, घरात पहिला पदवीधर. बापाने डीग्री माझ्या फोटोसहीत काचेत मढवली, त्याचा आनंद त्यांनाच माहीत.
आज त्याच नागपूर विद्यापीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता एम.ए. मराठी अभ्यासक्रमातून 1995 दरम्यान काढून टाकली. मराठी अभ्यासक म्हणाले तुकडोजी साहित्तीक नाही. त्याचं साहित्य प्रचारकी आहे. खूप काही बोलले. मी पेटून उठलो. आंदोलन छेडले. त्याच आंदोलनांने विद्यापीठ नामकरण आंदोलनाला ताकत मिळाली. 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाला निर्णय घ्यावा लागला विद्यापीठ नामविस्ताराचा. अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा आणि नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरूषांची ओळख मिळाली. पण या दोन्ही महापुरूषांच्या विचार साहित्याला अभ्यासक्रमात आजही विषेश स्थान नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंतांच्या साहित्यावर एम.ए. तुकडोजी विचारधारा अभ्यासक्रम सुरू झाला. पण त्याला आजही युजीसीची विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नाही. विद्यापीठ प्रशासनच उदासिन आहे. राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासक्रम तयार करण्यात डाॅ.सुभाष सावरकर आणि माझे (ज्ञानेश्वर रक्षक) याचं योगदान मोठं आहे. मी दहाच्यावर पुस्तके लिहिली ते संदर्भ ग्रंथ म्हणून विद्यार्थी अभ्यासतात. मात्र मी यशस्वी उद्योजक आहे का माहीत नाही? पण अनेक सामाजिक कार्यात लोकजागृतीचे कार्य करतो.
विदर्भ साहयता समितीचे बालसदन नागपूरात आहे. गरजु अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार देण्याच्या कामात माझे योगदान मी देत असतो. आजच शिक्षण कुठल्या पिढ्या घडवीत आहे? याचे मी चिंतन करीत असतो. परवाच बालसदनमधील विद्यार्थी प्रवेशाचा वाईट अनुभव ग्रामीण आणि स्लम भागातील पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी भाषा वाचता येत नाही. इंग्रजी तर दूरच कुठल्या पिढ्या घडवत आहोत आम्ही शिक्षणातून?? शिक्षणप्रणाली भारतात एक का नाही?
भारतीय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य दहावी आणि बारावीच्या शिक्षणावर अवलंबून आहे. याठिकाणी दोन शिक्षणप्रणालीत विद्यार्थी शिकतात. महाराष्ट्र शिक्षणबोर्ड आणि सीबीएसई सेंट्रल शिक्षण बोर्ड दोघांचे अभ्यासक्रम वेगळे, परिक्षा पद्धती वेगळ्या. दोघांच्या निकालाचा गाजावाजा वेगळा. निकालाचे आकडे शेकड्यांना टच करणारे. पण काही मूठभर गरीब विद्यार्थी सोडले तर इतर विद्यार्थ्यांवर आई-वडीलांचा शैक्षणिक खर्च कुटुंबाच्या जेवणावर लागणार्या खर्चापेक्षा जवळ जवळ दहापटीचा.
अलीकडे शाळा आणि महाविद्यालयाच्या इमारती आणि तेथील शिक्षण हा फक्त दिखावा आहे. सारे शैक्षणिक धोरण खाजगी शिकवणी वर्गावर अवलंबुन आहे. शिकवणी नाही तर परिक्षेत हमखास नापास. असा प्रचारच मोठ्या प्रमाणात काही वर्षापासून आम्ही ऐकतो आहोत. आमच्या पीढीत शिकवणी वर्ग विद्यार्थ्यांसाठी, आता शिकवणी हुशारांसाठी. त्याचे कौतुक मेरीट गुणवत्ताप्राप्त. म्हणून पेपरमधले हसत फोटो पे? भरवतांना. इथपर्यंत मुलांचे कौतुक ठीक. पण पुढे ह्या मुलांच भविष्य काय? कारण दहावी आणि बारावी नंतरच विविध क्षेत्रातील शिक्षण महागडच्. शिक्षणात कुठले व्यवहारी ज्ञान शिकविल्या जाते? आज कृषीतज्ञ म्हणून मिरविणाऱ्यांचा शेतीमातीशी काहीच नातं नाही. तो शेतकऱ्यांना शेती करायच ज्ञान देतो. गाईचे दुध काढायची अक्कल नसलेला तज्ञ गाय उपयोगी प्राणी कसा आहे. यावर तत्वज्ञान सांगतो. सायंसचा विद्यार्थी बँकेची परीक्षा देऊन बँकेत अकाऊंट लिहतो. पटवाऱ्यांच्या नोकरीसाठी इंजीनीयर परिक्षा देतो. शेतात आणि खाजगी व्यवसायात रोजगार करायला आजची तरूणपीढी यायला तयार नाही. शिक्षणातले तज्ञ समजणाऱ्यांजवळ कुठलही शैक्षणिक धोरण नाही. शासकिय यंत्रणा अशा विद्वानांच्या बटीक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1955 मध्ये प्रकाशीत ग्रामगीतेत ‘जीवन शिक्षण’ या अध्यायात लिहले आहे.
दिखाऊ कपडे, कोरडी ऐट । नोकरपेशी थाटमाट ।
हे शिक्षणाचे नव्हे उद्यिष्ट । ध्यानी घ्यावे नीट हे आधी ।। 5 ।। ग्रा. अ. 19
अजब ऐसी शिक्षणाची प्रथा । जेथे कामी न ये बापाची संथा ।
बाप करी शेतीची व्यवस्था । मुलगा मागे नोकरी ।। 6 ।। ग्रा.अ. 19
व्हावे मोठे बाबूसाहेब । काम जुजबी, पैसा खूब ।
मोठी पदवी, दिखाऊ ढब । ही उच्चता म्हणोचि नये ।। 7 ।। ग्रा.अ. 19
भारत स्वतंत्र 1947 ला झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1955 मध्ये ग्रामतीतेत शिक्षण घेणाऱ्यांची मानसिकता मांडली. हे माझ्या पीढीने बघितले आणि आजही बघतो आहोत. लाखानं पगार, कामाच्यावेळा मर्यादीत, सुट्या भरपूर, पेंशन यामुळे प्रत्येक शिक्षित डीग्रीधारक शासकीय नोकरी म्हणजेच रोजगार समजायला लागला. हे सर्व लाभार्थी भारतीय संविधानाने दिलेले अधिकार सांगतात. शेतकरी आणि श्रमीकांचे काय? यावर ते बोलत नाही. तेही काल श्रमीक कुटुंबात जन्मले. आज परिस्थितीत बदल जरी झाला असेल तरी, भौतिक सुखात भारतीय जनजीवन आणि तरूणपीढी ग्रासली आहे.
राष्ट्रसंत लिहतात-
हे सर्व मागील विसरोन । मुला-मुलींना द्यावे शिक्षण ।
जेणे गावाचे वाढेल भूषण । सर्वतोपरी ।। 8 ।। ग्रा. अ. 19
नुसते नको उच्च शिक्षण । हे तो गेले मागील युगी लपोन ।
आता व्हावा कष्टिक, बलवान । सुपुत्र भारताचा।। 9 ।। ग्रा.अ. 19
स्वातंत्र्यानंतर अवघ्या आठ दहा वर्षातच राष्ट्रसंतांना हे शिक्षण मागील युगी लोपले असे का जाणवले? यावर तरुणपीढीने चिंतन करावे. श्रमप्रतीष्ठा वाढवावी.
शिक्षण आणि आरोग्य मोफत मिळावे –
भारतीय संविधानावर चर्चा करणारे शिक्षण आणि आरोग्यावर वरवर चर्चा करतात. त्यांचा या दोन्ही क्षेत्रातील खाजगीकरणाला छुपा पाठींबा असतो. शासकीय यंत्रणा कुचकामी असल्याचे हेच सांगतात, जे शासकीय यंत्रणेत काम करतात.
भारता शेजारील लहान देश व्हीएतनाम, भूतान, जपान, बँकाँग या देशात तेथील नागरीकांना शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी तेथील शासनाकडून मोफत उपलब्ध करून दिल्या जाते. माझे मित्र सुहास वाकोडे यांचे सासर नार्वे या देशात राहते. त्यांचा साळा भारतात येऊन त्याची प्रकृती बिघडली. भारतात उपचार केले. पण प्रकृती सुधारत नव्हती. त्याच्या देशाला नार्वेला कळवले. एक स्पेशल विमान डाॅक्टर आणि सर्व सुविधासहीत भारतात आले. त्याला घेऊन त्याच्या देशात जाऊन त्याच्यावर उपचार केले. भारताला हा सुदिन केव्हा दिसेल की खोट्या विश्वातच आम्ही जगणार, खाजगीकरणाचे टाळकुटत?
» ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा
मो. 9823966282