बच्चू कडूंच्या उपोषणाला जरांगे पाटील यांचा पाठिंबा

शेतकरी नेत्यांनी एकत्रितपणे पूर्ण राज्य बंद करावे – जरांगे

का टा वृत्तसेवा
तिवसा : मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून येथे आलो आहे, असे स्पष्ट करतानाच बच्चू कडू यांच्या आंदोलनासाठी राज्यातील तमाम शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन राज्य बंद करावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी येथे केले.
                         शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी येथे उपोषणास बसलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांची बुधवारी दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. जरांगे पाटील म्हणाले की, या मुद्द्यावर सरकारला सळो की पळो करून सोडले पाहिजे. राज्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी त्यासाठी रान पेटवून बंदची हाक द्यावी. माझा प्रत्येक मराठा बांधव त्या दिवशी रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
                         जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरावेच लागेल, असे सांगून बच्चूभाऊंची तब्येत दिवसेंदिवस बिघडत असल्याने यासाठी घाई करा, असा सल्लाही जरांगे पाटील यांनी दिला. या वेळी त्यांच्यासोबत आंतरवाली सराटी, बद्री कारथ येथील शेतकरी पुढाऱ्यांसह आप्पासाहेब कुपेकर, मराठा आंदोलक अमर काळे, नानासाहेब पवार, संजय गोडसे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी माजी मंत्री महादेव जानकर व शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांनीही उपोषणस्थळी पोहोचून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

बच्चूभाऊ! तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत : जरांगे पाटील

                         बच्चूभाऊ, तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत असून काहीही करायला आपण तयार आहोत. तुमच्या मागण्या मान्य न केल्यास या सरकारला सळो की पळो करून सोडू, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चांगले माहिती असल्याचेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News