मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल: 12 दिवस आधीच आगमन,

यंदा सरासरीपेक्षा जास्त असणार पाऊस : हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा

मुंबई : राज्यातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे.
                        दरवर्षी साधारणतः 7 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. शनिवारी केरळात पोहोचलेल्या मान्सूनला, महाराष्ट्रात आगमनासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मात्र यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून रविवारी महाराष्ट्रात दाखल झाला.

हवामान विभागाने काय सांगितले?

                        आज 25 मे 2025 रोजी नैऋत्य मान्सून पश्चिममध्य आणि पूर्वमध्य अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटकच्या काही भागात, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राच्या काही भागात, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि मिझोरामच्या काही भागात, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पुढे सरकला आहे. मान्सूनची उत्तर सीमा 15.5°N/55°E, 15.5°N/60°E, 16°N/65°E, 16.5°N/70°E, देवगड, बेलागावी, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, 15°N/83°E, 18°N/87°E, 20°N/89°E, ऐझवाल, कोहिमा, 26.5°N/95°E, 27°N/97°E.
                        पुढील 3 दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात, कर्नाटकसह बंगळुरू, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

                         यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सून 107 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो.

1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यानचा पाऊस मान्सून

                          मान्सून लवकर किंवा उशिराचा पावसावर परिणाम होत नाही. फक्त 1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यानचा पाऊस मान्सूनचा म्हणून नोंदवला जातो. गेल्या 50 वर्षांत, मान्सून नियोजित तारखेला म्हणजे 1 जून रोजी फक्त तीनदा दाखल झाला. 25 वेळा तो 1 ते 12 दिवस आधी आला आहे. 22 वेळा तो उशिरा आला आहे. 2009 मध्ये, जेव्हा मान्सून 23 मे रोजी आला तेव्हा फक्त 78% पाऊस पडला. 2009 मध्ये मान्सून 13 जून रोजी आला होता, पण त्या वर्षी 102% पाऊस पडला होता.

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

                        दरम्यान, अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.




मुंबई-ठाण्यात यलो अलर्ट, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट, केरळात आठवडाभर आधी दाखल
मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत वातावरणात गारवा पसरवला आहे. शनिवारी रात्रीपासून मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाच्या सरी बरसत असून, हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट, तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज सकाळपासून संततधार सुरू आहे. दक्षिण मुंबईत रिमझिम पावसाचा अडथळा नसलेला स्वरूप कायम असून, उपनगरांमध्ये अधूनमधून मुसळधार सरींचा जोर दिसून येतो आहे.
                        दरम्यान, अद्याप शहरात कुठेही मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याचे प्रकार समोर आलेले नसले, तरी हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा परिसरातही पुढील 3-4 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सून केरळमध्ये आठवडाभर आधी दाखल

                         यंदा नैऋत्य मोसमी पाऊस अपेक्षेपेक्षा आठवडाभर आधीच केरळात दाखल झाला आहे. 2009 नंतर प्रथमच इतक्या लवकर मान्सूनने केरळचा टप्पा गाठला आहे. शनिवारी मान्सूनने केरळ, तामिळनाडू व्यापून कर्नाटकच्या दिशेने वाटचाल केली असून, आता तो गोव्याच्या वेशीवर पोहोचला आहे. पुढील काही तासांत कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकण आणि मध्य अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ढगाळ हवामान आणि जोरदार पावसाचे चित्र निर्माण झाले आहे.

पुण्यात रिमझिम पावसाची सुरुवात

                        रविवारी पहाटेपासून पुण्यात रिमझिम पावसाची सुरूवात झाली असून, वातावरणात गारवा आणि आल्हाददायक बदल जाणवू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात शहरातील काही भागांत पाणी साचल्याने प्रशासन सजग झाले आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाने वेग घेतल्याने प्रशासन सजग झाले आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News