मेंढपाळ कुटुंबातील मुलगा बनला IPS अधिकारी

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवले यश, बिरदेव ढोणे याचा प्रेरणादायी प्रवास

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावातील बिरदेव सिद्धाप्पा ढोणे याने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. यूपीएससी 2024 च्या परीक्षेत त्यांनी 551वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. विशेष म्हणजे, तो आपल्या तालुक्यातील पहिला IPS अधिकारी असून एका मेंढपाळ कुटुंबातून आला आहे. कठोर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कुठलेही शिखर गाठता येते, हे बिरदेव ढोणे याने दाखवून दिले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर संधीचे सोने करून यश प्राप्त करू शकता, असे बिरदेव म्हणाला
                       बिरदेव याचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्याच्या घरी वीज नव्हती, अभ्यासासाठी शाळेच्या व्हरांड्याचा आसरा होता. वडील मेंढपाळ, आई गृहिणी अशा पार्श्वभूमीतून आलेल्या या युवकाला शिक्षण घेताना अनेक अडथळे आले पण त्याने कधी हार मानली नाही. बिरदेव हा पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता. दहावीत 96% गुण मिळवून मुरगूड केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आणि बारावीत 89% गुणांसह विज्ञान शाखेत यश मिळवले. पुढे त्याने पुण्याच्या प्रतिष्ठित COEP कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

दोनदा हुलकावणी, तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी

                        यूपीएससीच्या परीक्षेसाठी त्याने दिल्लीमध्ये दोन वर्षे अभ्यास केला. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये यशाने त्याला हुलकावणी दिली. पण या अपयशाने खचून न जाता त्याने जिद्दीने मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात 551 वा क्रमांक मिळवून आयपीएस पदाला गवसणी घातली. बिरदेवच्या यशाने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण गावाला अभिमान वाटतो आहे.

निकाल लागला तेव्हा मेंढरे चारण्यात व्यस्त होता बिरदेव

                        यूपीएससीचा निकाल 22 एप्रिल रोजी जाहीर झाला. निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आईवडीलांसोबत बेळगाव परिसरात मेंढरे चारण्यामध्ये व्यस्त होता. दिल्लीतील सहकारी मित्रांनी फोनद्वारे बिरदेव ढोणे याला तो आयपीएस अधिकारी झाल्याची आनंदाची बातमी दिली. यावेळी ढोणे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. या यशाबद्दल बिरदेवचा पारंपारिक फेटा बांधून तसेच हार घालून सत्कार करण्यात आला.

बकरी राखण्याच्या कष्टापेक्षा अभ्यास सोपा वाटत होता

                       यूपीएससीतील यशाबद्दल बोलताना बिरदेव म्हणाला, यूपीएससी परीक्षेत देशातून 551 वा रँक मिळाला. हे यश प्राप्त केल्यानंतर खूप भारी वाटतंय. प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी असेल, तर आपणही यशाला गवसणी घालू शकतो. मेंढपाळाचा मुलगा असल्याने अभ्यास करताना थोडा त्रास झाला, पण जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाबद्दलची ओढ असल्यामुळे अभ्यास आवडत होता. बकरी राखण्याच्या कष्टापेक्षा अभ्यास सोपा वाटत होता. तेच माझ्यासाठी मोटिवेशन होते. अभ्यास नाही केला, तर आपल्याला पारंपारिक मेंढी आणि शेळी पालन करावे लागेल. हीच माझाी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसच्या तयारीसाठी प्रेरणा होती.

पारंपारिक व्यवसायातील अस्थिरतेपेक्षा स्थिरतेला प्राधान्य दिले

                        बिरदेव पुढे म्हणाला की, बकरी आणि मेंढ्या राखणे आता सोपे राहिले नाही, खूप अवघड झाले आहे. गडी मिळत नाहीत, शेतकरीही शेताच्या बांधाला येऊ देत नाहीत, त्यामुळे मेंढपाळ व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे चांगली नोकरी मिळवून आयुष्यात स्थैर्य मिळवणे महत्त्वाचे असल्याचे वाटत होते. मेंढपाळ व्यवसायात अस्थिरता आहे, त्यापेक्षा मी स्थिरतेला प्राधान्य दिले. जी यूपीएससी मला देणार होती. अभ्यास केल्यानंतर आपण आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलू शकत होतो. या विचाराने मला अभ्यासासाठी प्रेरणा मिळत गेली.

तुम्ही गरिबीत मेलात, तर तो तुमचा दोष

                         यूपीएससीचा निकाल आल्यानंतर मला धक्का बसला. चांगला रँक मिळवून एका मेंढपाळाचा मुलगा आयपीएस अधिकारी बनू शकतो. हे खूप भारी वाटत होते. मुलांना सांगण्याचा उद्देश हाच आहे की, स्वत:वर कितीही वाईट परिस्थिती आली, पण तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि समर्पणाची भावना असेल, तर तुम्ही तुमच्या परिस्थितीवर मात करून चांगली नोकरी मिळवू शकता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोट आहे, ‘तुम्ही गरिबीत जन्मला, हा तुमचा दोष नाही. पण गरिबीत मेलात, हा तुमचा दोष आहे’ प्रयत्नांची पराकष्ठा केली, तर संधीचे सोने करून यश प्राप्त करू शकतात. माझ्यासारखा मेंढपाळाचा मुलगा करू शकतो, तर तुम्हीही करू शकतात. गावाकडच्या मुलांनी कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता, आपले प्रयत्न आणि चिकाटी ठेवली तर सगळ्या गोष्टी साध्य करणे सोपे आहे, असा संदेश बिरदेव याने तरुणांना दिला.

फोन चोरीला गेला, पोलिसांना भावच नाही दिला

                          युपीएससीची मुलाखत दिल्यानंतर ज्ञानप्रबोधिनी येथील अभ्यास केंद्रावरुन जात असताना रात्री 11 वाजता राधिका भेळ येथून माझा फोन चोरीला गेला. माझा फोन चोरीला गेला ही गोष्ट मी अद्यापही घरी सांगितली नाही. माझा फोन बंद पडला, असे मी घरच्यांना सांगितले. पण खरं तर माझा फोन चोरीला गेलाय. त्यामुळे, आजही माझ्या बीडच्या मित्राचा फोन मी वापरत आहे, असे बिरदेवने सांगितले. तसेच, फोन चोरीला गेल्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला भावच नाही दिला, माझी तक्रारही घेतली नाही, असे बिरदेवने एका मुलाखतीत बोलताना सांगितले. ज्या पोलिसांनी बिरदेवची तक्रार घेतली नाही, तो बिरदेव आता आयपीएस अधिकारी बनला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News