एकाच्या तोंडावर बोट, एकाच्या डोळ्यावर बोट, तर एकाचे कानावर हात; बच्चू कडूंचा सरकारवर निशाणा
अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कानच राहिलेले नाहीत. तीन माकडांसारखी अवस्था झाली आहे. एकाच्या तोंडावर बोट आहे, एकाच्या डोळ्यावर बोट आहे. एकाच्या कानावर हात आहेत, अशी खरमरीत टीका बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर केली आहे.
अमरावतीमध्ये संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मंगळवारी प्रहार पक्षाचा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संताजी आणि धनाजी पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक सभेत शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन दिले होते. चार महिने झाले, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कानच राहिलेले नाहीत. त्या तीन माकडांसारखी अवस्था झाली आहे. आता कुणाला सांगावे. कोणता भोंगा वाजवावा. ज्यामुळे या तीन माकडांचे तोंड उघडेल, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
…पण अजूनही देशाची अवस्था जशीच्या तशीच
बच्चू कडू म्हणाले, गिरता वही है जो रुकता है. बच्चू कडू रुकने वाला नही है. दौडने वाला है. पराभव झाला हे डोक्यातून काढून टाका. 56 इंचापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची छाती मोठी आहे. 75 वर्ष काँग्रेसचे गेले आणि 20 वर्षे भाजपचे गेले. पण अजूनही देशाची अवस्था जशीच्या तशीच आहे. बरे झाले मी निवडणुकीत पडलो, किमान आता वेळ तरी मिळत आहे. बच्चू कडूची ताकत बच्चू कडूमध्ये लपली आहे आमदारकीमध्ये नाही. मी सांगतो बच्चू कडू धावणारा आहे पडणारा नाही.
अर्थसंकल्पात कृषिसाठी तुटपुंजी तरतूद
तामिळनाडू सरकारचा अर्थसंकल्प 3 लाख कोटींचा आहे. कृषी क्षेत्रासाठी 44 हजार कोटींची तरतूद आहे. उत्तर प्रदेश सरकारचा 8.5 लाख कोटींचा अर्थसंकल्प असताना शेतकऱ्यांसाठी 45 हजार कोटी ठेवले आहेत. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 7.5 लाख कोटी आहे, पण कृषी क्षेत्रासाठी केवळ 9 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाते. कोण यावर प्रश्न विचारणार? कोण या विषयावर पुढाकार घेणार?. एकही शेतकरीपुत्र बोलायला तयार नाही. काही अंधभक्त त्यावरही टाळ्या वाजवताना दिसत आहेत. या लोकांच्या टाळक्यात हाणण्याचे काम प्रहार केल्याशिवाय राहणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.
7 जूनपासून उपोषणाला बसणार
अजित पवार, पंकजा मुंडे, संजय राठोड यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत. 5 जूनला आपण मोटारसायकल किंवा गाडीने यवतमाळला ताकतीने जाणार आहोत. तिथून आपण नागपुरात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जाणार आहोत. पालकमंत्री बावनकुळे म्हणतात आम्ही कर्जमाफी देऊ पण तारीख सांगत नाहीत. जर 15 दिवसांत तारीख नाही सांगितली तर तुमचे चाक आम्ही अडवू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या मोझरीला 7 जून पासून मी उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीच तोपर्यंत मी त्याठिकाणीच थांबणार आहे, असा थेट इशाराही बच्चू कडू यांनी दिला.