♦ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे शिबीर सुरू
♦ दासटेकडी आश्रमात 120 विद्यार्थी 20 दिवस घेणार संत विचारांचे धडे
अमरावती : जाज्वल्य प्रबोधनकार म्हणून अख्ख्या देशाला परिचित असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे अमृतप्राशन करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल १२० विद्यार्थी येथे जमले आहेत. दासटेकडीवरील आश्रमात ते तब्बल २० दिवस राष्ट्रसंतांचे विचारधन समजून घेतील. राष्ट्रसंत अध्यात्म केंद्राने या शिबिराचे आयोजन केले असून श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराच्या वार्षिक आयोजनाचा तो एक भाग आहे.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी पुरुषोत्तम गावंडे होते. उद्घाटन निवृत्त लेफ्टनंट कर्नल लक्ष्मण गाले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गुणवंत डहाणे, बाबुराव धोटे, डॉ. चंदनसिंह राजपूत, समितीचे ज्येष्ठ जीवन-प्रचारक रामदास चोरोडे गुरुजी, अरुण सालोडकर, हभप नामदेव गव्हाळे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, हभप दिनकर चोरे, रमेश मोकदम, सुरेश घाटोळ, महादेव कांडलकर, प्राचार्य डॉ. पाळेकर, कविता येनूरकर, कमल गुडधे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराची मांडणी करताना संस्थेचे सचिव लोककलावंत प्रमोद पोकळे यांनी आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, देशाच्या जडणघडणीत संत-विचार प्रभावी भूमिका बजावतात. पहलगामसारखे दहशतवादी हल्ले देशात घडत असताना संत-महापुरुषांच्या विचारांतून मिळालेले सुसंस्कारच त्यापासून जगाला वाचवू शकतात. म्हणून विज्ञान, तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षणासोबतच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचारप्रणालीनुसार निर्माण होणारी सुसंस्कारित पिढी निश्चितच आदर्श समाज निर्माण करू शकते. यासाठी आजच्या काळात ही सर्वांगीण सुसंस्कार शिबिरे मजबूत राष्ट्र उभारणीसाठी अत्यावश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र-संचालन रवींद्र ढवळे यांनी केले, तर आभार डॉ. नरेंद्र तराळे यांनी मानले. यावेळी शिबिरार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी शिबीर प्रमुख रवींद्र ढवळे, रूपेश मोरे, गणेश दरवरे, योगेश मेंढे, मयुर इंगळे, अरुण फंदे, निवृत्ती इंदूरकर, अभिनय काळे तर व्यवस्थापनाची जबाबदारी रवींद्र वानखडे सांभाळीत आहेत.
शिबिरात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचारप्रणालीचे धडे
संपूर्ण लोक-सहकार्यावर चालणाऱ्या या शिबिरात पहाटे ४.३० ते रात्री ९.३० पर्यंत आदर्श दिनचर्येत, संत-महापुरुषांचे चरित्रदर्शन, धर्म-समभाव, राष्ट्रीय एकात्मता, स्वदेश-प्रेम, वक्तशीरपणा, आज्ञापालन, स्वावलंबन, सेवावृत्ती आदिंचे बौद्धिक तसेच व्यायाम व भजन-संगीताचे शिक्षण सेवाभावी शिक्षकांकडून दिले जाणार आहे.