महापुरूषांच्या वादळी जीवनाने मानवी जीवनातले वादळ शांत केले : ज्ञानेश्वर रक्षक
नागपूर : वानाडोंगरी हनुमाननगर येथिल महाराष्ट्र चौकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंच व मानव अधिकार संरक्षण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारसा संतांचा’ कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे अभ्यासक ज्ञानेश्वर दादा रक्षक तर जिएसटी अधिकारी राज गायकवाड, समता सैनिक दलाचे मार्शल श्रावण गोसावी व मानवाधिकार संरक्षण मंच सदस्य प्रा. प्रविण भिमटे उपस्थित होते.
याप्रसंगी ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले की, शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करुन स्वतःचे आत्मपरीक्षण करा. समाजासाठी झटणाऱ्या सर्वच महापुरुषांचा जन्म हा वादळातच झाला. परंतु आमच्या जिवनातील वादळ शांत करुन आम्हाला सुखी केले. आम्ही देणारे आहोत. महापुरूषांचे विचार डोक्यावर नाही डोक्यात घ्यां. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपानच्या विश्वधर्म परिषदेत विश्वशांतीसाठी भगवान बुध्दाच्या पंचशीलाचे महत्व समजावून सांगीतले. विश्वाला भगवान बुद्धांच्या पंचशीलाची गरज आहे. तसेच गांवागावात ग्रामजयंती साजरी करा, असे आवाहनही रक्षक यांनी केले.
प्रविण भिमटे यांनी शासकिय योजनांची माहिती दिली. या योजना अजुनही तळागळातील विद्यार्थ्यापर्यंत पोहचल्या नाही. तेंव्हा मानव अधिकार संरक्षण मंचासोबत संपर्क करुन योजनांची माहिती प्राप्त करण्याचे आवाहन त्यांनी केले. समाजासाठी झटणाऱ्या सर्व महापुरुषांचे विचार संविधानात बघायला मिळतात. प्रशासनाला प्रश्न विचारण्याची ताकत स्वतःमध्ये निर्माण करण्याचे आवाहन राज गायकवाड यांनी केले. तर डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी काय केले? यावर मार्शल गोसावी यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन आदर्श अडिकाने यांनी, तर प्रास्तविक महेश वासनिक व आभार सुरज आपतुरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंच व मानव अधिकार संरक्षण मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.