नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) चंद्रपूरमध्ये कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. सोमवारी येथे ४५.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते.
विदर्भातील इतर शहरांमध्येही उष्णतेचा कहर कायम आहे. ब्रम्हपुरीमध्ये ४५.२, अकोल्यात ४४.८, अमरावतीत ४४.४, गडचिरोलीत ४४.०, नागपूर आणि वर्ध्यात ४४.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. यवतमाळमध्ये ४४.०, वाशिममध्ये ४३.५, गोंदियात ४२.७ आणि बुलढाण्यात ४०.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागपुरातील १३ चौकांमधील सिग्नल दुपारी १ ते ४ या वेळेत रेड ब्लिंकवर ठेवण्यात आले आहेत. शहरातील चौकात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रीन नेट लावण्यात आल्या आहेत.
तीव्र उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्ते आणि उड्डाणपूल कर्फ्यू लागल्यासारखे निर्मनुष्य दिसत आहेत. सामान्यतः गजबजलेले रस्ते दुपारच्या वेळी ओस पडले आहेत.