कळमेश्वर : बालवयात मिळालेल्या संस्कार शिदोरीवरच मुलांच्या जीवनाची बेरीज वजाबाकी अवलंबून आहे. यासाठी संत विचाराची कास धरणे गरजेचे असून, सुसंस्कार शिबिरातून आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन आचार्य महंत एकोव्यास बाबा (चंद्रपूर) यांनी केले.
श्रीक्षेत्र देवबर्डी (मोहपा) येथे आयोजित सुसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी त्यांनी ते बोलत होते. याप्रसंगी आचार्य प्रवर महंत वाकीकर बाबा, कृष्णमुणी दर्यापूरकर, रामकृष्ण दोरवे आदी उपस्थित होते. या शिबिरात नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातून ७५ शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दररोज श्रीमद्भगवद्घ्गीता अध्याय पाठांतर, श्रीदत्त कवन, शाश्वत नीती मूल्य, संत परिचय, महानुभाव संप्रदायाची ओळख, बोधपर कथा, श्री पंचकृष्ण लीळा, विधी ज्ञान आदी विषयावर अभ्यास वर्ग घेण्यात आले.
तसेच भजन, आरती, श्लोक, पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सुयश प्राप्त करणार्या परी काळबांडे, माही वानखेडे, तन्वी चौधरी, अध्ययन सोमकुवर, विराज मेंघर, अर्पिता ठाकरे, मानवी पवार यांचा सत्कार करण्यात आला.
महानुभाव बाल सुसंस्कार शिबिराचे उद्घाटन अश्विनी लांडगे, प्रेमा विद्वांस, उषा कऊटकर, राष्ट्रीय कीर्तनकार सचिन काळे, माणिक देशभ्रतार यांच्या हस्ते करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉ. उपेंद्र महात्मे, लक्ष्मण केचे, चांदूरकर यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरात प्रशिक्षक म्हणून कल्याण दादा वाकीकर, अजय दादा वाकीकर, प्रेमाताई, उद्धव दादा वाकीकर, मदालसाताई, नीताताई, आशाताई, अश्विनीताई यांनी काम पाहिले. कार्यक्रमास नलू श्रीखंडे, दीपक ढोके, उषा कऊटकर, मंगेश केचे, गुरुदास कावरे, संदीप महाजन, रवींद्र भोंगाडे आदींनी सहकार्य केले.