मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचे समर्थक व म्हसळा तालुक्याचे सरचिटणीस संतोष पाटील यांच्या दोन्ही मुलांवर काळाने घाला घातला असल्याची दुःखद घटना घडली आहे. संतोष पाटील यांचे दोन्ही चिरंजीव आपल्या बहिणीच्या मुलाला घेऊन श्रीवर्धन तालुक्यातील वेळास बीचवर फिरायला गेले होते. यावेळी समुद्रात पोहताना तिघांचाही मृत्यू झाला आहे.
बहिणीचा मुलगा नुकताच ऐरोली येथून शाळेला सुट्टी लागल्यामुळे गावी आला होता. त्याला घेऊन मयुरेश संतोष पाटील (23) व अवधूत संतोष पाटील (26) यांनी बहिणीचा मुलगा हिमांशु पाटील (21) याला घेऊन श्रीवर्धन तालुक्यातील वेळास बीचवर फिरायला गेले होते. यावेळी समुद्रात पोहण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे सगळे पोहण्यासाठी समुद्रात गेले. मात्र, समुद्राच्या लाटांनी या तिघांना गिळंकृत केले. यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दोन दिवसांपूर्वीच पाटील कुटुंबाने नवीन गाडी घेतली होती. यात संपूर्ण कुटुंब आनंदी होते, मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोहताना बुडून मृत्यू झाल्यानंतर येथील स्थानिक बोट चालकांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले व कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.