August 15, 2025 8:03 am

सासरी निघालेल्या नवरीला पळवण्याचा कट उधळला

6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, उपसरपंचासह तिघांना अटक

खुलताबाद : बाजारसावंगी येथे नवरीला पळवून नेण्याचा कट वऱ्हाडी मंडळींनीच उधळून लावला. याप्रकरणी ६ जणांवर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली, तर तीन जण फरार आहेत. अटक केलेल्यांत बिल्डा येथील एका उपसरपंचाचा समावेश आहे. हा सर्व प्रकार प्रेमप्रकरणातून घडल्याची चर्चा आहे.

                         दरम्यान, पकडले जाण्याच्या भीतीने नवरीला पळवून नेणाऱ्यांनी कार जाेरात दामटल्याने कारने दुचाकीला उडवले. यात एक जण गंभीर जखमी झाला. २५ एप्रिल रोजी महेश (नाव बदलले) यांचे लग्न झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता नवरदेव व नातेवाईक लिंबाजी चिंचोली येथे पोहोचले. दुपारी लग्न आटोपून महेश नवरीला घेऊन बाजारसावंगीला परत येत असताना आकाश गणेश मते व त्यांच्या मित्रांनी कारने (एमएच २८ एझेड ६६९९) पाठलाग सुरू केला. संध्याकाळी साडेपाच वाजता इंदापूर परिसरात नवरदेवाची कार अडवली.

                           नवरदेव, नवरी व नातेवाइकांशी वाद घालून मारहाण केली. नवरीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड झाल्याने नागरिक जमा झाले. त्यांनी तरुणांना चोप दिला. त्यामुळे ते कारने पसार झाले. बाजारसावंगीत त्यांच्या कारने पुलावर दुचाकीला धडक दिली. यात तीन जण जखमी झाले. एकाची प्रकृती गंभीर आहे.

प्रेमप्रकरणातून घटना घडल्याची चर्चा

                         फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील आकाश मते व कन्नड तालुक्यातील लिंबाजी चिंचोली येथील मुलगी यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबध असल्याचे बोलले जात आहे. प्रेमसंबध असूनही अचानकपणे मुलीचे लग्न होत असल्याची माहिती आकाशला मिळाली. यामुळे आकाश व त्यांच्या मित्रांनी २५ एप्रिल रोजी मुलीला पळवून घेऊन जाण्याचा प्लॅन आखला. ते त्या प्लॅनमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News