भक्ती मनातला भगवान जागृत करणारी असावी !
अपने आतम के चिंतनमें, हरदम जागृत रहना है।
ओहंम सोहंम स्वाससे अपनी, अंतरदृष्टी निरखना है ।।
अंतर मनातला देव खरा आहे. पण त्याच्या सभोवताल राग, लोभ, मोह, माया, द्वेष, मत्सर याचा प्रभाव मोठा असतो. भक्तिचा खरा अर्थ अंतरमन शुद्ध करणे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सोप्या भाषेत भक्तीचा अर्थ सांगीतला, भक्तिविणा, उद्धार नाही कुणाचा,
भक्तिसाठी निर्धार पाहिजे मनाचा ।
ऐका हा भाव जिवाचा, जिवाचा ।।
निर्धारपूर्वक सत्कार्य करणे तिलाही भक्तिच म्हणतात. ज्यात अनेकांच्या भल्याचा विचार असतो. पण आपण स्वार्थी माणस संकुचित अर्थाने भक्तिकडे पाहतो. ईश्वरप्राप्ती होते असा गैरसमज करून घेतो. मग ईश्वाराला मागाल ते मिळते या भ्रमात सर्व कर्तव्यांना बाजूला सारतो.
राष्ट्रसंत म्हणतात-
हे ऐकांना संत पुरावे, अनुभवियांचे अनुभव घ्यावे ।
शांति-सुखाचे आगर बरवे, आपण तरूनी दुजा तरावे । तोडिल फास यमाचा यमाचा ।।
आपले कर्तव्य करीत मानवी जीवन जगतांना, अनेकांना मदतीची साथ देतांना, थोरा मोठ्यांचे अनुभव जे सत्यावर आधारीत असेल त्यावर आपल्या जीवनाचे मार्गक्रमण केले, तर यमराजा तुमचा दास बनेल, म्हणजेच वाईटाचा नाश होईल. ‘मानवता’ हा आमचा मूळ धर्मच आज माणूस विसरत आहे. मानवानेच मानवात भेदा-भेद निर्माण केले आहे. एका जनप्रतिनिधी खासदाराला आपल्याच धर्माच्या मंदिरात प्रवेश नाकारल्या जातो. हे कुठल्या भक्तिचे लक्षण आहे? आमचे माणूसपणच आज हरवत आहे.
तरण्यासी भवसागर सगळा, अवघड हा षडरिपुंचा मेळा ।
पार कराया या कळिकाळा, नाही दुजा कुणी मार्ग निराळा । निज संदेश शिवाचा शिवाचा ।।
मानवी जीवनाच्या भवसागरात सुख-दुःख जीवाचा धर्म आहे. तो पार करून आमच मानवी जीवन आम्हालाच सुखकर करायचा आहे. कोणीतरी येईल आणि आमचे भलं करेल, हा परावलंबी जीवनाचा कमकुवतपणा आहे. निसर्गातल्या पशुपक्ष्यांच्या जगण्याकडे बघा. ते स्वतःचं घरकुल (घरटं) स्वतःच उभारत. उन, वारा, पाऊस त्याच्या घरट्यांना धक्का लावू शकत नाही. हिंस्त्रपशु, मानव सोडून त्यांच्या घरट्यातल्या पिलांना इजा पोहोचवणार याची दक्षता ते घरटे बांधतांना घेतात. कोणत्या शाळा, काॅलेजाच्या शिक्षणातून हे घडलेत? कोणी दिले हे संस्कार यांना? पक्षी आपले अन्न ते संग्रही न करता, रोज अन्न शोधायला जातात. संग्रही वृत्तीने आजचा माणूस प्रचंड ग्रासला आहे. त्यातूनच प्रचंड दुःखाची निर्मिती आहे.
तुकड्यादास म्हणे ऐकाना, नित्य प्रभूचे भजन कराना ।
व्यसने सगळी सोडूनी द्याना, सरळपणाचे जिवन जगाना । लोभ करा सर्वांचा ।।
राष्ट्रसंत म्हणतात, नित्य प्रभुचे भजन म्हणजे, संत-महापुरूषांच्या विचाराचे चिंतन, त्याप्रमाणे जगण्याचा संकल्प याची आठवण रोज का करावी लागते? कारण वाईट प्रवृत्ती शिकायला सत्संग लागत नाही, वाचन लागत नाही. ते सहज जीवनाला चिकटत असतात. त्यातून मुक्तता हीच खरी भक्ती आहे. ती सरळपणाच्या जीवन जगण्यातून मिळते. भौतिक सुखाच्या दिखाव्याला लाताळंत जगणे म्हणजे खरा सत्संग. आज सत्संगाचे मेळावे सर्वदूर वर्षभर चालतात.
तरी भ्रष्टाचार, बलात्कार, सामाजिक अंधरूढ्या, भ्रष्ट व्यापार करणारे, खाण्याच्या वस्तुची भेसळ करणारे, स्वार्थासाठी लुबाडणारे, व्यक्तिगत राजकारणासाठी मानवाच्या झुंडीना जाती-पोटजाती आणि धर्मा, धर्मात लढवणारे? वाढतांनाच दिसतात. संत-महापुरूष जन्माला आलेल्या देवा-धर्माच्या देशात हे सारं थांबत का नाही? कोण करेल चिंतन? भक्तिचे सोंगढोंग करणाऱ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात –
‘आजच्या कुजलेल्या समाजात चारित्र्य निर्माण करणे, ही भयानक विषमता नष्ट करणे आणि समाजाचे अज्ञान व दुबळेपण घालवून नवे राष्ट्र उदयास आणणे, हे आजचे प्रश्न सर्व संतांनी हाताळलेच पाहिजेत. पंथद्वेष, स्पृश्यास्पृष्य, जातीयता, अमानुष रूढ्या, अंधश्रद्धा, स्त्रियांची गळचेपी, दुर्दशा इत्यादी दुःखदायी गोष्टी हर प्रयत्नांनी दूर करून समाजाची सर्वांगिण उन्नती करणारे ज्ञान व कार्य आपण सर्वत्र पसरविले पाहिजे.’

मित्रांनो शिक्षितांची संख्या आज भारतात वाढली आहे. तशीच धार्मिक स्थळांची संख्या वाढत आहे. पण माणूसकीच्या शाळा कुठेच दिसत नाही. राष्ट्रभक्तीचा दिखावा वाढतो आहे. सत्य शोधा आणि स्वाभिमानी राष्ट्रउभारणीसाठी राष्ट्रभक्ती जागवा. चला उठा राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरूणांनो, विरवृत्तीचा दिवा उजळवा, जागृत व्हा तरूणांनो, हाक आली क्रांतीची!

राष्ट्रसंतांच् साहित्य विद्यापीठाच्या प्रत्येक अभ्यासक्रमात घ्या : ज्ञानेश्वर रक्षक यांची मागणी!
”५१ हजार विद्यार्थी विद्यापीठ गीत गाणार, राष्ट्रसंतांच्या स्मृतिदिन ११ आक्टोंबरला”, विद्यापीठ प्रशासनाची अशी बातमी ज्ञानेश्वर रक्षक यांच्या वाचनात आल्यावरून त्यांनी विद्यापीठाचं अभिनंदन केलं आहे. मात्र राष्ट्रसंतांच् समृद्ध साहित्य विद्यापीठाच्या सर्वच अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाला असलं पाहीजे व एम. ए. राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारेला युजीसीची मान्यता का नाही ? असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला का पडत नाही ? राष्ट्रसंतांची जयंती – पुण्यतिथी विद्यापीठासह विद्यापीठाअंतर्गत संपूर्ण महाविद्यालयातून का साजरी होत नाही ? असा परखड सवाल त्यांनी विद्यापीठाला विचारला आहे. एक दिवस राष्ट्रसंत रचीत विद्यापीठ गीत गाऊन राष्ट्रसंतांच् साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचणार ? अशी विचारणा ही श्रीगुरूदेव युवा मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी व्यक्त केली आहे.
