मुंबई : पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी राऊत यांचा उल्लेख एकेरी शब्दांत करत त्यांना वेळ प्रसंग पाहून बोलण्याचा सल्ला दिला आहे.
संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना पहलगाम अतिरेकी हल्ल्याप्रकरणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकावर टीकेची झोड उठवली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला करारा जबाब देंगे म्हणजे काय दोन – चार मशिदी पाडणार का? हिंदू-मुसलमान करणार का? यापेक्षा हे लोक वेगळे काय करू शकतात? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता. भाजप या हल्ल्याचा वापर बिहार विधानसभा निवडणुकीसाठी करणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
संजय राऊत यांच्यावर एकेरी टीका
नरेश म्हस्के आपल्या एका पोस्टमध्ये संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करताना म्हणाले की, अरे गांजावाल्या संजा, तुला थोडी लाज वाटते का? दहशतवादी हल्ला आपल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांवर झालाय… त्या भ्याड दहशतवाद्यांनी निरागस, निष्पाप लोकांना वेठीस धरले… धर्म विचारून गोळ्या घातल्यात रे…तू त्याच्यावर राजकारण करतोस???? शरम वाटली पाहिजे तुला…. हा देशावरचा हल्ला आहे. कुठेतरी ओकायचं थांब…?? वेळ प्रसंग बघून तरी ओकत जा…
अर्थात, तुझ्या ओकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणा सरकार यांना काही फरक पडणार नाही… ते त्यांचं कर्तव्य परमनिष्ठेने करतात, करतील… आणि तुझ्याकडून सल्ला घेण्या इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आलेली नाही. कोविड सारख्या जागतिक संकटातही स्वतःच्या तुंबड्या भरणारे तुमच्यासारखे लांडगे केंद्रात बसलेले नाहीत… तू तुझे भोंगे तुझ्या डबक्यात वाजवत राहा… राष्ट्रीय सुरक्षा वगैरे तुझ्या आवाक्यातले विषय नाहीत…
अमित शहा हे आजवरचे सगळ्यात सक्षम आणि निर्णायक भूमिका घेणारे गृहमंत्री आहेत. आपली पोहोच मागच्या दाराने येण्याची आहे. त्यामुळे त्यांच्या भानगडीत पडू नको. काँग्रेसची आणि देशद्रोह्यांची दलाली करत रहा, असे नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे.