या सरकारला केवळ हिंदू-मुस्लिम करता येते

शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही: विजय वडेट्टीवार

काटा वृत्तसेवा
नागपूर : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये पावसाने विक्राळ रूप धारण करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मुंबई पुणे सारख्या जिल्ह्यांना देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर टीका केली आहे.
                         नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले, अद्यापही कोणता मंत्री, नेता, आमदार यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा ऐकण्यासाठी वेळ नाही. यांना केवळ राजकारण करायचे आहे. यांना केवळ सत्ता आणि खुर्ची महत्त्वाची आहे. काल मी विखे पाटील पाहिले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करायला पाहिजे. अवेळी पाऊस वगैरे हे एनडीआरएफच्या निकषात बसत नाही, मी त्या खात्याचा मंत्री होतो. पण राज्य सरकार म्हणून एचडीआरएफचे निकष आहेत, त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे. केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नका. आम्ही हे करतो, ते करतो म्हणत बसू नका. नाहीतर शेतकरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

हे केवळ हिंदू मुस्लिम करत राहतात

                        पुढे बोलताना विजय वडेट्टवार म्हणाले, थोडी देखील शेतकऱ्यांची कीव नाही यांना. एवढे मोठे संकट आलेले असताना सुद्धा त्यानंया मदतीची घोषणा नाही. थातुरमातूर पंचनामे केले जात आहेत. धान उत्पादक शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. रग्बी पिकाचे सर्व धान अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाहीत. त्यांना परवानगी नाही. आम्ही सातत्याने मागणी करत आहोत, पण त्याकडे दुर्लक्ष आहे. काय करत आहे सरकार? कुठे आहे सरकार? काय कळत नाही. आम्हाला सरकारच दिसत नाही. मुंबई एवढी मोठी तुंबली. ज्या मेट्रोचे उद्घाटन झाले होते ते पूर्ण गळत लागले होते. नवीन मेट्रोचे पूर्ण बोगस काम केल्याचे दिसून आले. या सरकारला काहीच दिसत नाही. हे सरकार अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती आहे. हे केवळ हिंदू मुस्लिम करत राहतात आणि जनता गेली खड्ड्यात. याच्या पलीकडे यांना काही देणे-घेणे नाही. हिंदू मुस्लिम करून यांना मते मिळतात.

                         विजय वडेट्टवार म्हणाले, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सरकारने पुन्हा एकदा निराशा केली आहे. दरवर्षी जाहिर होणाऱ्या किमान आधारभूत भावामध्ये धानाला तुटपुंजी 69 रुपयांची वाढ करुन ती 2369 रुपये करण्यात आली आहे. सरासरी 3 हजार रुपयांचा दर अपेक्षित असताना सरकारने मात्र धान उत्पादकांकडे पुन्हा दुर्लक्ष केले आहे. राज्यात 22 जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन घेतले जाते. त्यातल्यात्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये दोन्ही हंगामांमध्ये धानाचे पिक घेतले जाते. मे महिन्यापासूनच धान शेतीच्या तयारीला सुरुवात होते. जमिनीची वखरणी ते प्रत्यक्षात धान कापणीपर्यंत शेतकऱ्यांना येणारा खर्च मोठा असतो. धानाचे उत्पन्न चांगले येईल या अपेक्षेने शेतकरी खर्चही करतो. त्यासाठी विविध बँका आणि सावकारांकडून कर्ज काढतो. परंतु, काही वर्षांपासून हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, गारपिट आदी कारणांमुळे धानाचे मोठे नुकसान होत आहे. त्या तुलनेत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली भाववाढ धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News