नागपुरात नवविवाहितेची आत्महत्या

लग्नाच्या 35 दिवसांनंतर हुंडा मागणीला कंटाळून 26 वर्षीय तरुणीने संपवले जीवन

नागपूर :  पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण अजूनही ताजे असताना नागपूरमध्येही अशीच एक धक्कादायक हुंडाबळीची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयुरी ठाकरे डाहुले (वय २६) या तरुणीने ३० मे रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तिचा विवाह अवघ्या ३५ दिवसांपूर्वी म्हणजेच २५ एप्रिल २०२५ रोजी अभिषेक डाहुले याच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला होता.

                         मयुरीचा विवाह नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या अभिषेक डाहुलेशी झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचे भासवले गेले. मात्र, काहीच दिवसांत तिची सासू कुसुम डाहुले, सासरे दीपक डाहुले आणि दीर आदित्य डाहुले यांनी सतत पैशांसाठी मयुरीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. नवरा अभिषेक डाहुले यानेही या छळाला पाठिंबा दिल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

                        शारीरिक आणि मानसिक छळामुळे मयुरी अत्यंत तणावात होती. काही दिवसांत परिस्थिती सुधारेल असे वाटल्याने तिने सुरुवातीला तिला होत असलेल्या त्रासाची माहिती वडिलांना दिली नव्हती. मात्र, छळ न थांबल्यामुळे तिने आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला. वडिलांनी मदतीचा हात पुढे करत गटाच्या भीशीतील २० हजार रुपये सासरच्या मंडळींना दिले, मात्र त्यानंतरही छळ थांबला नाही. छळाला कंटाळून मयुरीने गळफास घेऊन जीवन संपवले. मयुरीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अभिषेक डाहुले, सासू कुसुम डाहुले, सासरे दीपक डाहुले आणि दीर आदित्य डाहुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News