♦ चार प्रवाशांना आपला जीव गमवला, तर 9 जण जखमी झाले
♦ मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत ठाण्याच्या IT इंजिनिअरचा दुर्दैवी अंत, घरात होता एकुलता एक
♦ रेल्वे कोट्यवधी जनतेच्या आयुष्याचा कणा, पण आज अव्यवस्थेचे प्रतीक – राहुल गांधी
मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या रेल्वे अपघातात लोकल ट्रेनमधून खाली पडून चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये ठाण्यातील 44 वर्षीय आयटी इंजिनिअर मयूर शाह यांचा समावेश आहे. मयूर शाह यांचे डोंबिवलीत घर घेण्याचे स्पप्न होते. त्यासाठी ते आज डोंबिवलीला निघाले होते. परंतु, त्यांचा हात घसरला आणि रेल्वेतून खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे काही प्रवासी लटकून प्रवास करत होते. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर सीएसएमटीवरून आलेली दुसरी लोकल प्रवाशांना घासल्यामुळे दरवाज्याजवळ उभे असलेले 13 प्रवासी खाली पडले. त्यातील चार जणांना आपला जीव गमवावा लागला.
घरात होता एकुलता एक
या दुर्घटनेतील मृतांमध्ये ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरात राहणाऱ्या मयूर शाह (वय ४४) या आयटी क्षेत्रातील अभियंत्याचाही समावेश आहे. मयूर विद्याविहार येथील एका खाजगी कंपनीत कार्यरत होते. तो अविवाहित असून आईसोबत राहत होता त्यांना दोन बहिणी आहेत. बहिणींचे लग्न झाले असून मयूर स्वतः अविवाहित होते.
दुर्घटनेतील मृतांची नावे
राहुल संतोष गुप्ता (२८) रा. दिवा
सरोज केतन (२३) रा. उल्हासनगर
मयूर शाह (४४)
जखमी व्यक्तींची माहिती
1. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
2. आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
3. रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
4. अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
5. तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
6. मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
7. मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
8. स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
9. प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
मृतांच्या कुटूंबीयांना 5 लाख रुपये जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून अपघातात ज्या 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटूंबीयांना मदत म्हणून आम्ही 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. याशिवाय जखमींना 50 हजार, एक लाख किंवा दोन लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांचा सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. याशिवाय ज्युपिटरला जे दोन रुग्ण गंभीर आहेत, त्यांचा सर्व खर्च शासन करेल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंनी रेल्वे अपघातातील जखमींची घेतली भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात जाऊन रेल्वे अपघातात जखमी झालेले प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.