मोहपा येथे राज्य शासनाच्या ‘महसूल व वन’ विभागाचे
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न
का टा वृत्तसेवा : भुषण सवाईकर
कळमेश्वर : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराचे आयोजन कळमेश्वर तहसील कार्यालयाच्या वतीने दिनांक 12 जून रोजी मोहपा नगरपरिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सावनेर उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, मोहपा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष इमेश्वर यावलकर, प्रमोद हत्ती, ग्रा. प. उपसरपंच लिंगा, प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराजस्व अभियाना अंतर्गत समाधान शिबिराचे प्रास्ताविक कळमेश्वर तहसीलदार रोशन मकवाने यांनी केले. संपत खलाटे यांनी शिबिरात आयोजित विविध शासकीय योजनांचे बाबतीत मार्गदर्शन केले. समारोपीय भाषणात इमेश्वर यावलकर यांनी आपल्या समारोपीय भाषणात शासनाच्या नागरिकांसाठीच्या सर्वच विभागाच्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी साठी प्रयत्न करण्याचे तसेच अशा शिबिरांचे नियमित आयोजन करण्याचे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाहन केले.

यावेळी संजय निराधार योजना मंजूरी पत्र, भूमी अभिलेख मार्फत प्राॅपर्टी कार्ड, विविध महसुली दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच महावितरणच्या वतीने वीज बीलाचा नियमित भरणा करणार्या पहिल्या पाच वीज ग्राहकांना लकी ड्राॅ द्वारे सोडत काढून मोबाईल फोन व स्मार्ट वाॅचचे वाटप करण्यात आले. तसेच दुर्गेश जुनघरे या दिव्यांग विद्यार्थ्यांला व्हिलचेअर प्रदान करण्यात आली.

यावेळी वनविभागाचे वतीने ‘हरित महाराष्ट्र व समृद्ध महाराष्ट्र’ योजने अंतर्गत 00 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करणार असल्याचे तसेच आदासा, उबाळी व तेलकामठी क्षेत्रामध्ये प्रत्येकी 11000 रोपे लावणार असल्याचे सांगण्यात आले. असे एकूण 23 हेक्टर मध्ये रोपे लागवड करीत असल्याची माहिती प्राप्त झाली.

कृषी विभागाचे वतीने कृषी अधिकारी यांनी शेतकर्यांनी सावधगिरीने बियाने खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. पेरणीचा सीजन सुरू झालेला असून बियाणे पेरणीसाठी उपलब्ध आहे. सोयाबीन सारखे नाजूक बियाण्यांची पेरणीपुर्व उगवण शक्तीचे परिक्षण करण्याचेही आवाहन कृषी विभागाचे वतीने करण्यात आले आहे.

अंगणवाडी मार्फत ग्रामिण भागातून ‘६ महिने ते ३ वर्षे’ वय असलेल्या बालकांना मोफत पोषण आहार दिला जातो. हा आहार सेवन केल्याने बालके निरोगी व सुदृढ होत आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आठवड्यातून ६ दिवस वेगवेगळ्या प्रकारे आहार दिला जातो. त्या आहारामध्ये मोड आलेले मूग, मोड आलेली मोट, राजगिरा लाडू, मुरमुरा लाडू, पालक पराठे, शेंगदाणा चिक्की, शेंगदाणे-गुळ इ. आहार सेवन केल्यामुळे बालकांच्या शरीराला कॅल्शियम व अन्य प्रथीने मिळून बालके निरोगी व सुदृढ होत असल्याची माहिती रेखा तुलसीराम गजभिये, अंगणवाडी सेविका क्रमांक 2, पारडी देशमुख यांनी दिली आहे.

महाराजस्व अभियाना अंतर्गत समाधान शिबिरात गटशिक्षण अधिकारी विशाल गौर, शिक्षण विस्तार अधिकारी उमेशसिंह कच्छवाह पं. स. कळमेश्वर, तालुका आरोग्य अधिकारी कुलकर्णी, विवीध शासकिय विभागाचे कर्मचारी तसेच मोठया संख्येने नागरिक उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षक प्रदीप विघ्ने यांनी तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार ज्योती जाधव यांनी केले.
