इराणसारखा देश ट्रम्प यांना भीक घालत नाही, मग मोदींनी युद्धबंदी का केली? : प्रकाश आंबेडकर
मुंबई : भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधी वरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. युद्धबंदी का जाहीर करावी लागली याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. युद्धबंदी जाहीर केली नसती, तर 1971 च्या युद्धाची पुनरावृत्ती झाली असती. पण आता आपण ती संधी गमावली, असेही ते म्हणाले. शिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भित्रे भागूबाई आणि कणा नसलेले नेतृत्व म्हटले आहे.
सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, पुलवामानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या तीन दिवसांत भारतीय वायुदलाने पूर्ण नियंत्रण मिळवले होते. पाकिस्तानकडे ना पुरेसे शस्त्रास्त्र होते ना सात दिवसांहून अधिक लढण्याची क्षमता. भारत पूर्णपणे वरचढ होता. हीच ती वेळ होती, ज्या वेळी आपण 1971 चा इतिहास पुन्हा लिहू शकलो असतो. पण, केंद्र सरकारने शस्त्रसंधी करून ही संधी गमावली.
…तर अमेरिका वाचवायला येत नाही
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “गेल्या 25 वर्षांपासून भारतावर सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमागे थेट पाकिस्तानच्या लष्कराचा हात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडे पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्याची सुवर्णसंधी होती. फक्त दहशतवाद संपवायचा नव्हता, तर पाकिस्तानचा देखील खात्मा करायचा होता. पण सरकारने ती दिशा न स्वीकारता माघार घेतली. यावर पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. देशावर दहशतवादी हल्ले झाले की अमेरिका आपल्याला वाचवायला येत नाही. आपले वीर जवानच आपली रक्षा करतात. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगतो, आपण मोठी ऐतिहासिक संधी गमावली, असेही आंबेडकर म्हणाले.
ट्रम्पचा दावा खोडण्याची मोदींमध्ये धमक नाही
भारत आणि पाकिस्तान युद्धाचे नियंत्रण हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले, ते म्हणाले की, “पहलगाम बाबत जी लढाई झाली त्याचे नियंत्रण हे ट्रम्प यांच्याकडे होते. भारत-पाकिस्तानने किती दिवस लढायचे, कधी थांबायचे हे ट्रम्प यांनी ठरवले. ट्रम्प यांनी केलेला दावा खोडून काढण्याची धमकही नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही.”
पंतप्रधान भित्रे भागूबाई अन् कणा नसलेले नेतृत्व
अमेरिकेच्या दबावानंतर नरेंद्र मोदींनी युद्धबंदी जाहीर केली, आपला पंतप्रधान हे भित्रे भागूबाई आहेत हे सिद्ध झालं अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. इराणसारखा देश डोनाल्ड ट्रम्प यांना भीक घालत नाही, पण मोदींनी तशी भूमिका घेतली नाही. नरेंद्र मोदी हे कणा नसलेले नेतृत्व असल्याची टीकाही त्यांनी केली.