‘मराठा समाजा’ला देणे शक्य नाही; ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची भूमिका
नागपूर : भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही, तर ते जातीला देता येते. त्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळात मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याचे आवाहन केले होते. मात्र, विदर्भ वगळता इतर कुठल्याही भागातील मराठा समाजाने तेव्हा कुणबी जातीचे प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे शक्य नसल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले आहे.
![]()
दरम्यान, सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जरांगे पाटील यांचे आंदोलन हे राजकीय आरक्षणासाठी असल्याची भूमिका मांडली आहे. नागपूर भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनीही मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे, त्यांच्या या भूमिकेचे ओबीसी महासंघ स्वागत करत असल्याचे बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले आहे.
पंजाबराव देशमुख म्हणजे महाराष्ट्रातल्या कृषी व शिक्षण क्रांतीचे जनक. दलितांसाठी मंदिर खुले करण्याच्या आंदोलनावेळेपासून त्यांच्यात व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये चांगली मैत्री निर्माण झाली होती. या कुणबी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेमध्ये काही तरतुदी कराव्यात अशी सुचना त्यांनी बाबासाहेबांना केली,
![]()
त्यानंतर ६० च्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा ‘कुणबी’ आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मकरीत्या मंजूर करण्यात आली. त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. आणि त्यामुळेच विदर्भातील बहुसंख्य कुणबी समाजाला आरक्षण मिळाले. यामागे डॉ. पंजाबराव देशमुखांचा खूप मोठा हात होता. पंजाबराव देशमुखांच्या या दूरदृष्टीचा फायदा विदर्भातील कुणबी समाजाला आत्तापर्यंत होतो आहे.
![]()
विदर्भातील या कुणबी समाजाला खऱ्या अर्थाने या आरक्षणाचा फायदा १९९० ला आलेल्या मंडल आयोगांच्या शिफारशींनंतर झाला. कारण या विदर्भातील मराठा समाजाने आधीच आपल्या जात प्रमाणपत्रात मराठा वगळून फक्त कुणबी अशी नोंद केल्याने एकूण १९ टक्के ओबीसी प्रवर्गात विदर्भातील कुणबी समाजाला ही स्थान मिळाले. या सर्वांमागे डॉ. पंजाबराव देशमुखांची दुरदृष्टी प्रामुख्याने कारणीभूत होती. देशमुखांनी विदर्भातील कुणबी समाजाला वेळीच जागं केलं. समाजातील मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांनी उचलेलं हे महत्वाचं पाऊल विदर्भातील कुणबी समाजातील अनेक पिढ्यांना फायदेशीर ठरलं आणि ठरत आहे.
![]()
![]()
![]()