August 15, 2025 3:05 am

इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे जाणार

उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे निमंत्रण,
राजधानी दिल्लीत आखली जाणार इंडिया आघाडीची रणनीती

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहेत. तसेच मुंबई महापालिका समोर ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता इंडिया आघाडीची बैठक राजधानी दिल्लीत होणार असून उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे निमंत्रण

                      विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने आता बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्लीत पोहोचणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना भोजनाचे निमंत्रण देखील असल्याची माहिती आहे.

ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक घेतली जाणार

                       इंडिया आघाडीची बैठक 7 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे हे 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्लीत पोहोचणार आहेत. तसेच सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार दिल्लीतच आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक घेतली जाणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.
                       महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्याचसोबत इंडिया आघाडीचे इतर राज्यातील प्रमुख नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशन असल्याने इंडिया आघाडीचे सर्वच प्रमुख नेते सध्या दिल्लीतच आहेत. त्यामुळे या बैठकीला सर्वच नेते उपस्थित असणार आहेत.

डीनर डिप्लोमसी करा किंवा लंच डिप्लोमसी काही होणार नाही

                       देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला. या दौऱ्यात उद्धव काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, त्यांनी डीनर डिप्लोमसी करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी. नंतर लंच डिप्लोमसी करावी. कितीही डिप्लोमसी केली, तरी जोपर्यंत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मार्ग सोडून ते दुसऱ्या मार्गावर जातील, तोपर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News