8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात

महत्त्वाच्या शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, महागाईवर मुद्द्यांवर जोरदार सामना अपेक्षित

मुंबई :  मुंबई/नागपूर: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर 2025 पासून नागपुरात सुरू होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन लांबणीवर जाईल अशी चर्चा होती. मात्र, राज्यपालांनी अधिकृत घोषणा करून अधिवेशन नियोजित वेळेतच होणार असल्याची स्पष्टता दिली.

अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार?

या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, जनहिताचे मुद्दे, विभागनिहाय विकास, तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात झालेल्या दिरंगाईसह अनेक विषयांवरून जोरदार चर्चा अपेक्षित आहे.
महागाई, बेरोजगारी, वीज दरवाढ, कथित मतदारयादी अनियमितता आणि शेतकरी प्रश्न या मुद्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होणे निश्चित मानले जात आहे.

निवडणुकांचा फड आणि अधिवेशनाची पार्श्वभूमी

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होतील. त्यानंतर जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता अधिवेशन 8 डिसेंबरपासूनच सुरू होईल हे निश्चित झाले आहे.

अधिवेशन किती दिवसांचे?

अधिसूचनेत अधिवेशनाचा कालावधी स्पष्ट करण्यात आलेला नाही. मात्र, परंपरेनुसार हे अधिवेशन एक ते दोन आठवड्यांत आटोपण्याची शक्यता आहे.
विधानसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता, तर विधानपरिषदेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

सरकारकडून तयारीला वेग

अधिवेशनाच्या सुरक्षेपासून ते लॉजिस्टिक्सपर्यंत सर्व तयारींना वेग आला आहे.

  • विधिमंडळ सचिवालयाने सदस्यांना सूचना पाठवल्या आहेत.

  • मंत्र्यांची निवासस्थाने आणि कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात नागपूरात हलवली जाणार आहेत.

  • शहरात सुरक्षाव्यवस्थेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार असून रेल्वे व हवाई सेवांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची परंपरा

नागपूर करारानुसार राज्याचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात आयोजित केले जाते.
पहिले हिवाळी अधिवेशन 1960 मध्ये नागपुरात भरले होते, ज्याचा कालावधी 27 दिवसांचा होता.
1968 मध्ये सर्वाधिक—28 दिवसांचे—अधिवेशन पार पडले. त्यानंतर अधिवेशनाचा कालावधी क्रमाक्रमाने कमी होत गेला असून यंदाही तो कमी कालावधीचाच असण्याची शक्यता आहे.

                         राज्यातील चुरशीच्या निवडणूक वातावरणात होणारे हे हिवाळी अधिवेशन राजकीयदृष्ट्या तापलेले असणार हे निश्चित आहे.

0
0

Leave a Reply

Realted News