‘कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश, तहसीलदारांना दिले निवेदन’
का टा वृत्तसेवा : आशिष देशमुख
कळमेश्वर : शेतकऱ्यांवर असलेल्या बँकांच्या व खाजगी कर्जाच्या मुक्तीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल दि. 26 मे ला कळमेश्वर तहसीलदार यांना निवेदन दिले. विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन देऊनही सरकार कर्जमाफी देण्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ करत आहे. सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही हे स्पष्ट झाल्याने या अन्याया विरोधात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. शेतकरी नापिकी व वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली.
या निवेदनात निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे उत्पन्नात घट झाली आहे. परिणामी, बँका व खासगी सावकारांकडील कर्ज फेडणे अशक्य झाले आहे. सरकारने निवडणुकीत आणि जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन तात्काळ पुर्ण करून कर्जमुक्ती जाहीर करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
कळमेश्वर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा प्रगतिशील शेतकरी बाबा कोढे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कळमेश्वर तहसीलदार रोशन मकवाने यांना कर्जमुक्ती बाबत निवेदन दिले. यावेळी शेतकरी किशोर वंजारी, अशोक बोरकर, विवेक वंजारी, शोभाबाई डाफ, वासुदेव डोंगरे, सुखदेव टेकाडे, वच्छला टेकाडे, आशिष देशमुख, अशोक जीवतोडे, विष्णू ताजने, प्रमोद पांडव, प्रकाश मोहोड, देवेंद्र पन्नासे, किशोर कोठेकर, राजेंद्र हले, दामोदर ठाकरे, विकास बेंडे, वसंता राऊत इ. उपस्थित होते.