ग्रामसभेत कोळसा खाणीच्या मुद्द्यावरून गावकऱ्यांची तीव्र नाराजी
गोंधळामुळे ग्रामसभा रद्द : गावकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप
का टा वृत्तसेवा : विजय नागपुरे
कळमेश्वर : गोंडखैरी (ता. कळमेश्वर) येथे अदानी कंपनीला कोळसा खाण सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने मासिक बैठकीत नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र, हा निर्णय ग्रामसभेत न मांडता, गावकऱ्यांना विश्वासात न घेता घेतल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी पसरली आहे. शुक्रवारी (दि.२९) हा विषय उघडकीस आल्यावर ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला. वाढत्या गोंधळामुळे सभा रद्द करण्यात आली. आता पुढील ग्रामसभा ९ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.
कोळसा खाणीबाबत ग्रामस्थांचा प्रश्न आहे की, या खाणीतून पुढील २५ ते ३० वर्षे कोळसा काढण्यात येईल. त्यानंतर जमिनीखाली पोकळ जागा निर्माण होणार असून, एखादा भूकंपाचा झटका बसला तरी संपूर्ण गाव कोसळण्याचा धोका उद्भवतो. अशावेळी हजारो लोकांच्या जीविताचा प्रश्न उभा राहील. याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच या खाणीमुळे गावकऱ्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणार असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शेती धोक्यात येईल ! कोळसा खाणीमुळे शेतकऱ्यांची शेती धोक्यात येईल. भूजलपातळी कमी होऊन पाण्याची टंचाई निर्माण होईल. कोळसा उत्खननामुळे धूळ, धूर आणि प्रदूषण वाढेल, ज्याचा फटका थेट गावकऱ्यांच्या आरोग्याला बसेल. खाणीसाठी अवजड वाहनांची सतत वर्दळ होऊन गावातील रस्ते उद्ध्वस्त होतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
”ग्रामपंचायत ही सर्वाची आहे. गावकऱ्यांच्या आयुष्याशी संबंधित इतक्या मोठ्या विषयावर ग्रामसभेची परवानगी न घेता घेतलेला निर्णय लोकशाहीविरोधी आहे. इतक्या गंभीर व दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या विषयावर ग्रामसभेत चर्चा होणे आवश्यक होते. परंतु, ग्रामपंचायतीने लोकांना अंधारात ठेवून केवळ काही प्रतिनिधींनी मिळून नाहरकत दिली.” – रजनीकांत अतकरी, सचिव, प्रहार जनशक्ती पक्ष, नागपूर जिल्हा

शेती धोक्यात येईल ! कोळसा खाणीमुळे शेतकऱ्यांची शेती धोक्यात येईल. भूजलपातळी कमी होऊन पाण्याची टंचाई निर्माण होईल. कोळसा उत्खननामुळे धूळ, धूर आणि प्रदूषण वाढेल, ज्याचा फटका थेट गावकऱ्यांच्या आरोग्याला बसेल. खाणीसाठी अवजड वाहनांची सतत वर्दळ होऊन गावातील रस्ते उद्ध्वस्त होतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
”कोळसा खाणीचे काम सुरू झाल्यावर निर्माण होणाऱ्या समस्या, गावातील तरुणांना रोजगार आदी अटी शर्ती ठेवून मासिक सभेत सर्वानुमते नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे ठरले, त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली.”– वर्षा अतकरी, सरपंच, गोंडखैरी













Users Today : 3
Users Yesterday : 11