♦ मेव्हण्याने विवाहीत महिलेशी लग्न केल्यास बदनामीची होती भिती
यवतमाळ : मेव्हण्याने विवाहीत महिलेशी लग्न केल्यास आपली समाजात बदनामी होईल म्हणून जावई, मामा आणि भावाने कट रचून जावयाने दोन मित्रांच्या मदतीने मेव्हण्यासह त्या विवाहीत महिलेची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. ही धक्कादायक घटना दिग्रस तालुक्यातील ईसापूर शेत शिवारातील दत्तापूर गावाजवळील कोलुरा ते फेट्री मार्गावर दि. ७ एप्रिलला उघडकीस आली होती. या प्रकरणातील चौघांना दिग्रस पोलिसांसह एलसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी शुक्रवारी दि. ११ एप्रिलला पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
वर्षा धनराज गिरे (वय २६) वर्ष रा. उमरी बु. जि. वाशीम आणि आकाश विलास बल्लाळ (वय २५) वर्ष रा. गोस्ता रूई जि. वाशीम अशी मृतकांची नावे आहेत. तर विजय भारत शिकारे (२९), राजेश सोनबा गोदमले (३४), धर्मराज तुकाराम बोडके (३०) सर्व रा. विठाळा ता. दिग्रस, विकास विलास बल्लाळ (२१), रा. गोस्ता रूई, जि. वाशीम अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे असून विशाल शिकारे हा अद्याप फरार आहे.
आरोपींनी जवळच्या दोन मित्रांना दिली सुपारी; दारुसाठी पैसेही पाठवले घटनास्थळावर दोन्ही मित्रांना बोलावून त्यांच्या मदतीने प्रथम आकाश याच्यावर हल्ला चढवून त्याची हत्या केली. त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या वर्षा हीचा पाठलाग करीत तिचीही हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्येचा मोबदला म्हणून राजेश गोदमले आणि धर्मराज बोडखे या दोघांना पाच हजार रूपये ऑनलाईन आणि पाच हजार रूपये रोख असे दहा हजार रूपये जावाई विजय याने दिले होते.
अशा प्रकारे पोलिसांना मिळालेल्या सुगाव्यावरून दिग्रस तालुक्यातील फेटरी, साकरी वनविभागाच्या जंगल परिसरात दि. ७ एप्रिलला अनोळखी तरूणासह महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनानंतर त्या दोघांची हत्या झाल्याची बाब समोर आली. मात्र ते दोघे कुठले रहिवासी आहेत, याबाबत कोणालाही काही माहिती मिळत नव्हती. त्यानंतर मृतदेहाच्या वर्णनावरून मृतकांचे स्केच तयार करण्यात आले. त्याचबरोबर आजूबाजूच्या जिल्ह्यातील मिसींग महिला, पुरूषांचा शोध सुरू करण्यात आला. तसेच शोधपत्रिका प्रसारित करण्यात आली. अश्यात दि. २९ मार्चला वाशीम जिल्ह्यातील उमरी येथील वर्षा गिरे ही महिला बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणाचा घागा पोलिसांना घागा गवसला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी रजनीकांत चिलुमुला, सतिश चवरे, सेवानंद वानखडे यांच्यासह एलसीबीतील अधिकारी यांनी पार पाडली.