मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अनियमितता झाली असल्याचा आरोप काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केला होता. त्यांनी लिहिलेल्या इंग्रजी वृत्तपत्रातील या सबंधित लेखाला भाजपने देखील प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, त्यानंतर आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना याबाबत चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या संभाव्य गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी आणि सध्याचे सरकार बरखास्त करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी पत्राद्वारे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना केली असल्याची माहिती पटोले यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काँग्रेसची पुढची भूमिका काय असेल? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नाना पटोले यांनी लिहिलेले पत्र देखील पहा….
भारतीय संविधानात नमूद केलेल्या लोकशाही मूल्यांचे, निवडणुकीचे पावित्र्य आणि सामान्य नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र मोठ्या चिंतेने आणि अपेक्षेने लिहित आहे.
अलीकडेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आणि तथ्यात्मक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की राज्यातील 82 विधानसभा मतदारसंघांमधील 12,000 हून अधिक मतदान केंद्रांवर प्रक्रियात्मक अनियमितता झाल्या आहेत, ज्यामुळे कोट्यवधी मतांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हा प्रश्न केवळ राहुल गांधींचा नाही तर महाराष्ट्रातील गाव, शहरे आणि आदिवासी भागात राहणाऱ्या कोट्यवधी मतदारांचा आवाज आहे. सामान्य जनता विचारत आहे की, निवडणुका निष्पक्ष झाल्या का? त्यांच्या मतांचा गैरवापर झाला का? आणि लोकशाहीच्या मंदिरातच लोकशाहीचे अपहरण झाले आहे का?
आदरणीय महोदया, जर निवडणुकीत हेराफेरी झाली असेल तर ती केवळ प्रशासकीय चूक नाही तर संविधानाच्या भावनेवर आणि सामान्य मतदाराच्या हक्कांवर हल्ला आहे. ही गंभीर चिंतेची बाब आहे आणि याची निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशी करणे ही काळाची गरज आहे.
म्हणून, तुम्हाला नम्रपणे विनंती आहे की-
1. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अनियमिततेची उच्चस्तरीय न्यायिक किंवा विशेष चौकशी समितीकडून चौकशीचे आदेश द्या.
2. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत, कृपया सध्याचे महाराष्ट्र सरकार बरखास्त करा आणि राज्यात पुन्हा निष्पक्ष विधानसभा निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करा.
महोदया, तुम्ही या राष्ट्राच्या सर्वोच्च संवैधानिक प्रमुख आहात. आम्हाला आशा आहे की, तुम्ही संविधानाची प्रतिष्ठा आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी निर्णायक पावले उचलाल. देशाचे भविष्य, लोकशाहीची प्रतिष्ठा आणि कोट्यवधी मतदारांचा विश्वास आज तुमच्याकडे पाहत आहे.