रणजित देशमुख हे फक्त एक नाव नसून संघर्षयोद्धाचे प्रतीक आहे. त्यांच्या जीवनात त्यांना अनेक गोष्टींशी संघर्ष करावा लागला. नगरपालिकेच्या शाळेत त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. लोकांच्या भल्यासाठी स्वतःचं कितीही नुकसान झाले तरी एकदा घेतलेला निर्णय त्यांनी कधीच बदलला नाही. अशा निडर, स्पष्टवक्तेपणा, आक्रमक शैली असलेल्या महान नेत्याचा जन्म 29 मे 1946 साली झाला. आई माधुरीबाई देशमुख, समाजसेवक वडील अरविंदबाबू देशमुख. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. यांनी सुराज्यासाठी आयुष्य वेचले. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढणारे हे घराणे. त्यामुळे लढाऊपणा रणजितबाबूंच्या रक्तातच आहे.
वडील अरविंदबाबू देशमुख यांनी कधीच कोणत्याही पदाचा लोभ केला नाही. शंकर गेडाम यांना 25 वर्ष आमदार म्हणून कार्य करता आलं, ते केवळ रणजित देशमुख यांच्या वडीलांमुळे. ते कुठेही गेले तर लोकांना त्यांच्या समस्या सतत विचारत असे, त्याचं निवारण करून देत असे. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत रणजितबाबूंनी देखील जनसेवा केली. त्यांनतरची पिढी म्हणजे रणजितबाबू यांचे सुपुत्र ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगिरी दमदार असलेले आमदार म्हूणन आहे, ते आमदार डॉ. आशिषराव देशमुख. त्यांनी तर समाजसेवेचा वसाच घेतलेला आहे. हा वसा इथेच थांबलेला नसून नातू डॉ. हृदय आशिषराव देशमुख डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत.
रणजितबाबू यांनी एकदा कोणाला शब्द दिला की तो कधीच माघारी घेत नसायचे. हो म्हटली की हो, नाही म्हटले की नाही. प्राण जाये पर वचन न जाये, हे सर्वश्रुत आहे. जनहिताच्या अनेक मुद्द्यांसाठी त्यांना कितीतरी नुकसान सहन करावं लागलं. पण त्यांचे समाजकारण, राजकारण हे फक्त जनतेसाठीच होते. वैयक्तिक फायद्यातोट्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. फायदा पाहिला तो फक्त आणी फक्त लोकांचा. आजही त्यांना बेशिस्त, खोटेपणा, लोकांची हेळसांड अजिबात खपत नाही. काड्या, कपट त्यांनी कधीच केले नाही आणि दुसऱ्यांनी केलेले खपवून घेतले नाही. जातपात, भेदभाव कधीच त्यांनी उभ्या आयुष्यात केला नाही.
वडवीहिरा या गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून रणजितबाबूंची राजकीय कारकीर्द सुरु झाली. पुढे मेंढला पंचायत समिती सर्कल मधून निवडून येऊन संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे व उच्चशिक्षित नरखेड पंचायत समितीचे सभापती होऊन बहुमान मिळविणे हा त्यांच्या नावावरचा विक्रमच होता. तेव्हा त्यांनी ग्रामीण विकासासोबतच ग्रामशिक्षण सुधार अभियानाअंतर्गत ग्रामीण शाळा सुधारित केल्या. त्यांनतर ते नागपूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले.
तेव्हा संपूर्ण राज्यात नागपूर जिल्ह्याला कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा पहिला पुरस्कार मिळवून दिला, लघुसिंचन योजनाचा विकास केला. त्याचा फायदा आजही शेतकऱ्यांना, लोकांना होत आहे. 1979 साली बुटीबोरी, हिंगणा व नागपूर येथे पुरामुळे अतोनात नुकसान झाले तेव्हा श्रीमती इंदिरा गांधी, संजय गांधी यांना तेथे नेले व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मदतीने आदर्श पुनर्वसन केले. पुढे सावनेरचे आमदार झाले. आमदारकीच्या या काळात सावनेर विधानसभेचा जेवढा विकास झाला तेवढा विकास आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने सावनेर क्षेत्राचा केला नाही. या भागात रस्ते केले, 80% गावे बारमाही रस्त्यांनी जोडली. आदासा, वाकी आदी धार्मिक व पर्यटन स्थळांचा विकास घडवून आणला.
मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये राज्यमंत्री पाटबंधारे, गृहनिर्माण हे जनतेला न्याय देत सांभाळले. राज्यमंत्री शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य या खात्यांना त्यांनी योग्य न्याय दिला. सगळीकडे गावखेड्यात आरोग्य सेवा मिळावी म्हणून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरु केली, लता मंगेशकर यांच्या नावाने नागपूर येथे लता मंगेशकर हॉस्पिटल उभारले, जे आज लाखो लोकांचा उपचार मोफत करत आहे. कॅबिनेट ग्रामविकास आणि नागपूरचे पालकमंत्री असताना राज्यातील सर्व खेड्यांची त्यांनी सुधारणा केली. कॅबिनेट कृषी व वस्रोउद्योग ही खाती मिळाली तेव्हा त्यांनी अनेक शेतकरीहिताचे निर्णय घेतले. त्यांनी प्रदेश काँग्रेसचे दोनदा अध्यक्षपद भूषविले. या दोन्ही काळात काँग्रेसला भरभरून मते मिळाली आणि सर्वाधिक जागा निवडून आणल्या. अशी अनेक मोठी पदे रणजितबाबूंनी जनकल्याणासाठी विभूषित केले. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावल्यानंतरच्या सर्वत्रिक निवडणूकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला, त्या वेळेस मोठंमोठे नेते इंदिरा गांधी यांना सोडून गेले. पण रणजितबाबू देशमुख नागपूर जिल्ह्यातील एकमेव असे होते की ते काँग्रेस सोबत होते, ही विशेष प्रामाणिकपणाची बाब. रणजितबाबू देशमुख यांना सभेसाठी कधीच गर्दी जमवावी लागली नाही, लोकं स्वतःच त्यांच्या सभेला गर्दी करायचे. अशा लोकांचा मनातल्या नेत्याला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…