37 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित, 17 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान सरकारकडून आकडेवारी जाहीर
शेतकऱ्यांना किती रुपये आणि कशी मदत मिळणार?
35 मिनिटांपूर्वी :>
मुंबई : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, राज्य सरकारने नुकतीच नुकसानीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
राज्यभरातील एकूण ३१ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे, त्यापैकी १७ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी आजपर्यंत झालेल्या नुकसानीची आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका यांसारख्या खरीप पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.
या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्यासमोर ऐन सणासुदीच्या तोंडावर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सरकारने तातडीने मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. पंचनामे वेगाने पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले असले, तरी शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. राज्याच्या या नुकसानीमुळे एकूण कृषी उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारकडून जुलै-ऑगस्टसाठी २२१५ कोटींची मदत मंजूर
दरम्यान, केंद्राकडून निधीची वाट न पाहता महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार रोजी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा, विभागनिहाय शेतकरी संख्या, मदतीचा तपशील असा. मराठवाडा – १३४९ कोटी ४९ लाख २५ हजार. छत्रपती संभाजीनगर – १० लाख ३५ हजार – ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजार. हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव – १० लाख ३५ हजार ६८ शेतकरी – ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजार. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर – ३ कोटी ७७ लाख ३१ हजार. जमिन खरडून गेलेल्यांना हेक्टरी ४७ हजार मिळतील, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना किती रुपये आणि कशी मदत मिळणार?
कोरडवाहूला प्रति हेक्टर – १८५००, बागायतीला – १७०००- बहुवार्षिक पिकांना – २२५०० रुपये, खरडून गेलेल्या जमिनीसाठी – १८००० ते ४७००० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत तर रेशीम उत्पादन नुकसान झाल्यास -एटी, मलबेरी टसर – ६००० तर मुगा रेशीमसाठी ७५०० रुपये मदत दिली जाणार आहे.
जनावरे, घर तसेच झोपडीचे काय?
दुधाळ जनावरे दगावल्यास ३७,५००, ओढ कामाचे जनावर – ३२०००, लहान जनावर-२००००, शेळी, मेंढी, बकरे, डुक्कर – ४०००- मोठी जनावरे मर्यादा ३ – छोटे जनावर मर्यादा – ३०- प्रति कोंबडी १०० (प्रति कुटुंब १०००० रुपये)- झोपडी- ८०००, पक्के घर १,२०,००० रुपये मदत मिळते.











Users Today : 3
Users Yesterday : 11