राज ठाकरेंनी 15 दिवसांपूर्वीच भाजपवर केली होती टीका

राज्यात भाजपकडून ठाकरे आणि पवार ब्रॅंड संपवण्याचा प्रयत्न : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू आहेत. परंतु आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे आता राज ठाकरे नेमकी भूमिका काय घेणार आहेत, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
                        चित्रपट निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनलवर झालेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी माझ्यासाठी महाराष्ट्राचे हित मोठे आहे तर इतर सर्व दुय्यम आहे. मी आमचे किरकोळ वाद बाजूला ठेऊ शकतो. मी उद्धव यांच्या सोबत काम करण्यास तयार आहे, परंतु प्रश्न फक्त एवढाच आहे की ते माझ्यासोबत काम करण्यास तयार आहेत का, असे विधान केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे दोघेही ठाकरे बंधू एकत्र येणार असे तयार झाले होते. तसेच राज ठाकरे यांनी महायुतीसह भाजपवर देखील टीका केली होती.

राज्यात भाजपकडून ठाकरे आणि पवार ब्रॅंड संपवण्याचा प्रयत्न

                        राज ठाकरे यांनी 15 दिवसांपूर्वीच भाजपवर जाहीरपणे टीका केली होती. एका मुलाखतीत बोलताना राज्यामध्ये भाजपकडून ठाकरे आणि पवार ब्रॅंड संपवण्याचा प्रयत्न सुरू असून यात कोणताही वाद नाही, असे स्पष्ट म्हटले होते. मात्र तो ब्रॅंड संपवणे शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. पुण्यात ‘इंडिया टूडे’च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले होते. तसेच नेते बदलले तरी ब्रॅंड राहील, असेही त्यांनी म्हटले होते.
                         राज ठाकरे म्हणाले होते, राज्यातील विचार करता राज म्हणाले की माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी सर्वात प्रथम राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकला होता. त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे होते. माझे वडील श्रीकांत ठाकरे सुद्धा होते. त्यांनी संगीतावर प्रभाव टाकला होता. त्या दोघांनंतर उद्धव आणि मी आहे. एकंदरीतच गेल्या काही दिवसातल्या त्यांच्या मुलाखतीतून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा वाढल्या होत्या. मात्र, आज त्यांनी फडणवीस यांची भेट घेत तासभर चर्चा देखील केली, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

भूमिकेवर ठाम राहणार की महायुतीसोबत जुळवून घेणार?

                       राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते, मी एक फोटो पाहिला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, सुनील तटकरे, अशोक चव्हाण, नारायण राणे, छगन भुजबळ आणि इतर नेत्यांच्या मध्यभागी बसले होते.
                       मी तो फोटो पाहिला तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि विचार केला की भाजपचे समर्थक त्याकडे कसे पाहत आहेत? त्यांना वाटले पाहिजे की आम्ही त्यांना सत्तेवरून हाकलून लावण्यासाठी खूप मेहनत केली आणि आता ते त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसले आहेत. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांचे भेटीनंतर राज ठाकरे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार की महायुतीसोबत जुळवून घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News