शालार्थ आयडी महाघोटाळ्यातील कोणताही आरोपी मोकाट सुटता कामा नये : भगवान चांदेकर

शिक्षण संस्थाचालक अंजिकरला अटक, आणखी संस्था चालक रडारवर

काटा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे
नागपूर : शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा नागपुरातील बहुचर्चित शालार्थ आयडी महाघोटाळा गेल्या दोन महिन्यांपासून गाजत आहे. नागपूर जिल्ह्यातील 580 शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचं निष्पन्न झाल्यावरून नागपूर सायबर पोलिसांनी बहुचर्चित शालार्थ आयडी महाघोटाळ्या प्रकरणी आणखी एका शिक्षण संस्था चालकाला अटक करण्यात आली. ओंकार भाउराव अंजिकर (46) रा. बाळाभाउ पेठ, कमाल चौक असे अटकेतील संस्थाचालकाचे नाव आहे. बोगस आयडी प्रकरणी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सोमवारी सायंकाळी घरूनच त्याला अटक करण्यात आली आहे.. एसआयटीचे प्रमुख पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे.

"AI निर्मित दृश्यचित्र"
“AI निर्मित दृश्यचित्र”

                         एसीपी सुनीता मेश्राम यांच्याकडून एसआयटीची जबाबदारी काढून घेतल्यानंतर प्रथमच संस्थाचालकाला अटक करण्यात आली. अंजिकर याची शांती निकेतन शिक्षण संस्था आहे. याअंतर्गत गुलशननगरात जय हिंद विद्यालय उच्च प्राथमिक शाळा आहे. बोगस आयडी तयार करून 18 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोपावरून अंजिकरला अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी एसआयटीने धापेवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय उच्च प्राथमिक शाळेचा संस्थाचालक (मोहपा) दिलीप धोटे (60) याला अटक केली होती. अटकेनंतर त्याची तब्येत बिघडल्याने त्याला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या घोटाळ्यात शिक्षण विभागातील चार बड्या अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. तसंच नागपूर सायबर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापनाही केली आहे. एसआयटीनं तपास हाती घेतल्यानंतर 9 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी उल्हास नरड, अनिल पारधी या बड्या अधिकाऱ्यांसह सुरज नाईक, सागर भगोले, भारत ढवळे या लिपिकांना जामीन मंजूर झाला आहे. वैशाली जामदार यांच्यासह चिंतामण वंजारी आणि मंघाम यांचा जामीन कोर्टानं फेटाळून लावला आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत,

"AI निर्मित दृश्यचित्र"
“AI निर्मित दृश्यचित्र”

                        सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून नागरिकांच्या शिक्षण या मुलभूत हक्काशी निगडीत आहे. याचे गंभीर दूष्परिणाम प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांवर झाल्याचे दिसून येते. यात संबधीत शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यानी तसेच संस्थाचालकांनी शासनाची मोठी फसवणूक केली आहे. आपल्या निहीत कर्तव्याशी बेईमानी करत दिवसाढवळया शासनाच्या तिजोरीवर डाका टाकला आहे. त्यावरही ताण या भ्रष्टांनी बेरोजगार शिक्षकांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांच्या शेतकरी, कष्टकरी पालकांची करोडो रूपयांनी फसवणूक करून त्यांना देशोधडीला लावले आहे.

सदर प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता, राज्यभर गाजत असलेले ‘‘शालार्थ आयडी महाघोटाळ्यातील कोणताही आरोपी मोकाट सुटता कामा नये.’’ तसेच सदर प्रकरणातील सर्वच आरोंपींवर कठोर कारवाईची मागणी ज.स. भ्रष्टाचार अन्याय निवारण समितीचे नागपूर विभागिय अध्यक्ष भगवान चांदेकर यांनी केली आहे.

संग्रहीत छायाचित्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News