सेन्सॉर बोर्डाकडून जात व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

‘फुले’ चित्रपटावरून सुनावले खडेबोल

मुंबई : थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या जीवनावर आधारित फुले नावाच्या हिंदी सिनेमावरुन सध्या वाद सुरु आहे. पुण्यातील ब्राह्मण महासंघाने या सिनेच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील अनेक सीन व संवाद कापण्याचे निर्देश दिलेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सेन्सॉर बोर्डावर टीकेची झोड उठवली आहे. जातीवाद्यांनी भरलेल्या सेन्सॉर बोर्डाने आपल्या सवयीप्रमाणे इथली जातव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला, असे ते या प्रकरणी म्हणालेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सेन्सॉर             बोर्डावर टीकेची झोड
खाली वाचा आव्हाडांची पोस्ट जशास तशी :

सत्य पराभूत होऊ शकत नाही!!!

                        भारतीय इतिहासात चातुर्वर्ण्य, कर्मकांड आणि ब्राह्मणवाद यांचे सत्य नाकारणे हा मूर्खपणा आहे. ज्यांना चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा दंश सहन करावा लागला, त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचाही समावेश आहे. या कर्मकांडामुळेच महाराजांना “तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही” असा विक्षिप्त आदेश देणारे कोण होते हे पाहणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. संभाजी महाराजांच्या हत्येचा कट कोणी रचला? यावर चर्चा झालीच पाहिजे. बरे झाले, काही लोकांनी महात्मा फुलेंवरील चित्रपटाला विरोध केला. यातून काही सत्य समाजापुढे येईल आणि झोपलेले बहुजन जागे तरी होतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाबाहेर बसवणारे कोण होते, त्यांना वर्गात का बसू दिले नाही? कोणत्याही एका समाजाचे बुद्धिमत्ता आणि ज्ञानावर नियंत्रण असू शकत नाही.
                         ज्ञान आणि बुद्धिमत्तेवर विशिष्ट समाजाची मक्तेदारी असेल आणि हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा मोडीत काढणारा कोणी असेल, तर त्यात महात्मा फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जातिव्यवस्था, भेदभाव आणि स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्याच्या विरोधात केलेले कार्य अजरामर आहे. त्यांचे कार्य कोणत्याही एका जातीसाठी नव्हते तर संपूर्ण मानवतेसाठी होते.
                         ब्राह्मणवादामुळे पतीच्या मृत्यूनंतर महिलेचे केस कापले गेले. ही अत्यंत विकृत प्रथा समाजातील एका वर्गात रूढ झाली होती. महात्मा फुले यांनीच याला विरोध केला होता. त्यांचा लढा त्या जातीतील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी होता. स्त्रियांना शिक्षित करायचेच नाही, हा आदेश त्याच कर्मकांडाचा एक भाग होता. त्याला पहिला धक्का फुले दाम्पत्याने दिला. स्त्री ही कोणत्याही जातीची नसते, ती आई, बहीण, पत्नी असते. याच विचाराने त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली. आज ज्या स्त्रियांकडे पुरोगामी म्हणून पाहिले जाते, त्यांचे दैवत म्हणजे महात्मा फुले आणि सावित्री माई आहेत.
                        फुले दाम्पत्याने कर्मकांड आणि ब्राह्मणवादाच्या विरोधात पुकारलेला संघर्ष नाकारण्याचा अर्थ आम्ही भयभीत आहोत असे म्हणणे आहे. सावित्रीबाईंनी समाजसुधारणा आणि महिलांना शिक्षित करण्याच्या कार्यात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला हे तुम्ही कसे नाकारू शकता? त्याच्या ऐतिहासिक नोंदी कागदपत्रांसह उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News