भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कमी होता कामा नये -भुजबळ
का टा वृत्तसेवा
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाने महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मांडला आहे. या निर्णयाचे आपण स्वागत करतो, परंतु भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये, अशी भूमिका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात मांडली.
राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सरकारच्या वतीने सभागृहात महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव मांडला. हा ठराव भारत सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. या ठरावावर आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ठरावावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आज महाराष्ट्र विधानसभेने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याच्या एकमताने मंजूर केलेल्या ठरावाचे मी स्वागतच करतो.
परंतु क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना देशातील जनतेने दिलेली ‘महात्मा’ ही पदवी सर्वोच्च पदवी आहे. या देशात फक्त महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोनच महात्मे असल्यामुळे भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी या ठरावावर विधानसभेत बोलताना मांडली.